
नवी दिल्ली | New Delhi
काही महिन्यांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह बडे नेते बाहेर पडल्यामुळे राष्ट्र्वादीत (NCP) मोठी फुट पडली आहे. यानंतर पक्षचिन्ह आणि पक्षाचे नाव आपल्या गटाकडेच राहावे यासाठी शरद पवार आणि अजित पवार गटाने निवडणूक आयोगामध्ये धाव घेतली होती. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नोटीस बजावली असून उद्या शुक्रवार (दि०६ ऑक्टोबर) रोजी दुपारी ३ वाजता सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
त्याआधी आज दिल्लीमध्ये (Delhi) शरद पवार गटाची विस्तारित कार्यसमितीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीसाठी २४ राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी हजेरी लावली होती. सदर बैठकीत आयोगाकडील सुनावणीमध्ये काही वेगळा निर्णय झाला तर पुढची रणनीती काय असेल? यासंदर्भात चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. यावेळी शरद पवारांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अजित पवार गटाला चांगलेच ठणकावले आहे.
यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, "राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे. आज ७० लोकांना माझ्या नावाचा प्रस्ताव दिला आहे. अजित पवार गटाची अध्यक्षपदाची निवड चुकीची असून निवडणुकीची पद्धत कशी असावी हे मी त्यांना सांगितले. जे आज म्हणतात की ही निवडणूक योग्य नव्हती. मात्र यावर त्यांच्या सह्या आहेत. आम्ही एकत्र बसलो, चर्चा केली. जे लोक गेलेत ते म्हणतात की पक्ष आम्हाला मिळेल, चिन्ह मिळेल. जे अजून व्हायचे आहे ते कसे सांगतात की हा निर्णय आमच्या बाजूने लागेल? मला कळत नाही हे असे कसे असू शकते?", असे प्रश्न शरद पवारांनी यावेळी उपस्थित केले.
तसेच पक्षाचे चिन्ह त्यांना (अजित पवार गट) मिळेल असा त्यांचा दावा आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय काही आला तरी चिंता करण्याचे कारण नाही. निवडणूक आयोगाचा निर्णय आपल्या बाजूने लागेल. देशाचे राजकारण बदलत असून आज अनेक राज्यात भाजपचे सरकार नाही. काही राज्यातील विरोधी पक्षाची सरकारे पाडून अनेक ठिकाणी भाजपने सत्ता स्थापन केली असा निशाणाही यावेळी शरद पवारांनी भाजपवर साधला.