शाहू महाराज छत्रपतींनी घेतली जरागेंची भेट; म्हणाले, “सरकारला आपली मागणी...”

शाहू महाराज छत्रपतींनी घेतली जरागेंची भेट; म्हणाले, “सरकारला आपली मागणी...”

जालना | Jalana

मराठा आरक्षणावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. आरक्षणाचे पडसाद आता राज्यातील अनेक जिल्ह्यांत दिसून येत आहेत. अनेक ठिकाणहून जाळपोळीच्या घटना समोर येत असतानाच, राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. अशातच आज कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज (Shahu Maharaj Chhatrapati) यांनी आंरवाली सराटीत उपोषणस्थळी जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली. मराठा कुणबी एकच आहेत सगळ्यांचा व्यवसाय शेती आहे आणि सरकारला आरक्षण द्यावंच लागेल असं शाहू महाराज छत्रपती यांनी म्हटलं आहे.

एक पुरावा मिळाला तरी पुरतो, १५ हजार पुरावे पुष्कळ झाले आहेत. जाळपोळ वगैरे जास्त झाली. आपली ताकद वाढली पाहिजे यासाठी जे करायचं आहे ते केलं पाहिजे. सरकसट आरक्षण आपल्याला मिळणारच आहे. सरकारला ते द्यावं लागेल. सरकारला ही मागणी मान्य करावीच लागेल. कुणबी, मराठा हे सगळे एकच आहेत. सगळ्यांचाच व्यवसाय शेती आहे असं शाहू महाराज छत्रपती यांनी म्हटलं आहे. मराठा आणि कुणबी एकच ही आमचीही भावना आहे असंही शाहू महाराज छत्रपती यांनी म्हटलं आहे. आज सरकार या प्रश्नी बैठकही घेतं आहे. आता अपेक्षा करु की सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करेल. मी मराठा समाजातल्या बांधवांना विनंती करतो की कुणीही आत्महत्या करु नये. आरक्षणाच्या लढाईत आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठिशी आहोत असंही आश्वासन शाहू महाराज छत्रपती यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी काय म्हटलंय?

मी महाराजांचा सन्मान करतो. मी रोज पाणी पितो ज्याप्रमाणे महाराज म्हणाले. मात्र पुढच्या दोन दिवसांत आरक्षण मिळालं नाही तर मी पाणी पिणं सोडणार. माझ्या दृष्टीने समाज महत्त्वाचा आहे. समाजाच्या हितासाठी मी आंदोलन करतो आहे. कुठल्याही प्रकारचं अर्धवट जीआर मी स्वीकारणार नाही. अध्यादेशही स्वीकारणार नाही. सध्या सरकार जे बोलतं आहे ते अर्धवट आहे. आम्ही अर्धवट आरक्षण आम्ही स्वीकारणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com