ज्येष्ठ पत्रकार वि.वि.करमरकर यांचे निधन

jalgaon-digital
3 Min Read

मुंबई  | Mumbai

नाशिकचे भूमिपुत्र, क्रीडा पत्रकार, लेखक, समीक्षक व समलोचक वि. वि. (बाळ) करमरकर (V V Karmarkar) यांनी आज वयाच्या ८५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. आज दि. ६ रोजी मुंबईतील अंधेरी येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने क्रीडा पत्रकारितेचा (Sports Journalism) एनसाक्लोपीडिया, तरुण क्रीडा पत्रकार व खेळाडूंचा मार्गदर्शक हरपल्याची भावना सर्वच क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

वि. वि. करमरकर  हे मूळचे नाशिकचे असल्याने त्यांचे आणि नाशिकचे घट्ट भावनिक नाते होते. करमकरांचे वडील डॉक्टर असल्याने आपल्या मुलानेही डॉक्टर व्हावं अशी त्यांची इच्छा होती. मात्र, करमकरांनी एम.ए. पूर्ण करत पत्रकरितेची वेगळी वाट निवडली. त्यातही क्रीडा पत्रकारितेत ते रमले.

इंग्रजी वर्तमानपत्राप्रमाणे मराठी वर्तमानपत्रातही खेळांच्या जास्तीत जास्त बातम्या असाव्यात असा त्यांचा आग्रह होता. त्याच आग्रहातून मराठी वर्तमानपत्रात खेळ या विषयाला वाहिलेलं स्वतंत्र पान सुरू झालं. या पानावर त्यांनी देशी-विदेशी खेळांच्या बातम्यांना प्राधान्य दिले होते. करमरकर यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत असून महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी करमरकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांद्याने आणले अश्रू; दर घसरताच केली कांद्याची होळी

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, संपादक, समीक्षक आणि समालोचक वि. वि. करमरकर यांच्या निधनाबद्दल राज्यपाल रमेश बैस यांनी दुःख व्यक्त करत म्हटले आहे, “श्री करमरकर सच्चे क्रीडा प्रेमी, उत्कृष्ट क्रीडा पत्रकार व मराठी समालोचन क्षेत्रातील आघाडीचे व्यक्तिमत्व होते. स्वातंत्र्योत्तर काळातील राज्याच्या एकूणच क्रीडा विकासाच्या मोठ्या कालखंडाचे ते अभ्यासू साक्षीदार व भाष्यकार होते. राज्यातील क्रीडा पत्रकारितेचा इतिहास त्यांच्या बहुविध योगदानाचा समावेश केल्याशिवाय अपूर्ण राहील, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.’’

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनीही शोक व्यक्त केला. मराठी पत्रकारितेत क्रीडा पत्रकाराला आणि क्रीडा पत्रकारितेला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या वि. वि. करमरकर यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्राचा मार्गदर्शक हरपला आहे. अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या. “ करमरकर यांनी लोकांमध्ये खेळाविषयी प्रेम निर्माण व्हावे यादृष्टीने विविध उपक्रम राबवले. खेळ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असला पाहिजे, यासाठी ते आग्रही होते. त्यांच्या प्रेरणेनेच मराठी दैनिकांत क्रीडा पान सुरू झाले. त्यांच्या निधनाने एक नवा प्रवाह सुरू करणारा पत्रकार आपण गमावला असं म्हणत त्यांच्या कुटुं‍बियांच्या दुःखात मी सहभागी असून हे दुःख सहन करण्याची ताकद ईश्वर त्यांना देवो,” असे फडणवीस म्हणाले. 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *