नाशिक | प्रतिनिधी
शालेय शिक्षण विभागाने नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग येत्या २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शाळांचे निर्जंतुकीकरण, शिक्षकांची आरसीपीटीआर चाचणी करण्यास सुरूवात झाली आहे….
शाळांना पुरविण्याच्या सुरक्षा साधनांची जबाबदारी नुकतीच जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांवर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार महापालिका, जिल्हा परिषदांमार्फत शिक्षकांची आरसीपीटीआर चाचणी, शाळांचे सॅनिटायझेशन करण्याचे काम सुरू झाले आहे.
नाशिक विभागातील महापालिका आणि इतर खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अँटीजन किंवा आरटीपीसीआर चाचणी आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. या चाचणीसाठी जाताना शिक्षकांना आधारकार्ड तसेच शाळेचे ओळखपत्र सोबत नेणे आवश्यक आहे.
पालकांच्या संमतीशिवाय मुलांना शाळेत प्रवेश देऊ नये, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यानुसार मुख्याध्यापकांनी पालकांना हमीपत्राविषयी माहिती दिली आहे. तसेच शालेय वेळापत्रक, शिक्षकांची उपस्थिती, शाळेत आणायच्या वस्तू याविषयीही कळविले आहे.
मात्र, निम्म्याहून अधिक पालकांकडून मुख्याध्यापकांना हमीपत्र दिलेले नाही. यामुळे प्रत्यक्ष सुरू होणाऱ्या शाळेला कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बहुसंख्य पालक पाल्याला शाळेत पाठविण्याच्या तयारीत दिसत नाहीत.
करोनाच्या भितीमुळे पालकांची पसंती ऑनलाइन शिक्षणाला असून अद्यापही बरेच विद्यार्थी त्यांच्या मूळ गावीच आहेत. तर काही पालकांनी डिसेंबरपासून मुलांना शाळेत पाठविण्याची तयारी दर्शविली आहे. तर, दुसरीकडे
महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी शाळेतील शिक्षकांची कोविड चाचणी करण्यास महापालिकेने नकार दिल्याचे समजते आहे.
मनपा शाळांचे निर्जुंतुकीकरण
शिक्षण विभागाकडून शाळांचे निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश प्राप्त होताच नाशिक महापालिकेने सर्व माध्यमिक शाळांचे तातडीने निर्जुंतुकीकरण केले आहे. २० ते २३ नोव्हेंबरदरम्यान पुन्हा एकदा सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण केले जाईल. ज्या शाळांमध्ये कोविड सेंटर उभारण्यात आले होते.