नवी दिल्ली
शेतकरी आंदोलनाचा आज ४७ वा दिवस होता. मागील महिनाभरापासून केंद्र सरकार व शेतकरी यांच्यात चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र सरकारची कानउघडणी केली.
याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फैलावर घेतले. सरकार ज्या पद्धतीने हे प्रकरण हताळत आहे, त्यावर आम्ही निराश आहोत. तुम्ही यातून तोडगा कसा काढत आहात? तुम्ही या कायद्यांची अंमलबजावणी थांबवणार आहात की, आम्ही पावले उचलायची? परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. लोक मरत आहेत. थंडीत बसले आहेत. तिथे अन्नपाणी पाण्याचे काय आहे? कोण व्यवस्था ठेवत आहे? कृषी कायद्यांची स्तुती करणारी एकही याचिका आमच्याकडे आलेली नाही. असे प्रश्न उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला फटकारले. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठाने सरकारला आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांविषयी चिंता व्यक्त केली.