
नाशिक | Nashik
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये नाशिक पदवीधरची (Nashik Graduate Constituency) निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसापासून राज्यात चर्चेची ठरली. याठिकाणाहून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) विजयी झाले. निवडणुकीनंतर तांबे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कॉंग्रेसमधील (Congress) अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला होता.
त्यानंतर सत्यजित तांबे यांचे मामा आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी कॉंग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा दिला. मात्र, या राजीनामानाट्यानंतर कॉंग्रेसच्या हायकमांडकडून थोरात यांची मनधरणी झाली. यानंतर कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील (H.K.Patil) यांनी स्वत: मुंबईत येऊन बाळासाहेब थोरातांची भेट घेत कॉंग्रेसमध्ये सक्रीय होण्याची विंनती केली.
यानंतर दोन दिवसापूर्वी थोरात यांनी संगमनेरमध्ये (Sangamner) येत सभा घेतली. त्यावेळी त्यांनी 'सत्यजितच पक्ष विरूद्ध अपक्ष किती चालतंय हे बघू. तुझ्याशिवाय कॉंग्रेसला आणि कॉंग्रेस मधील तुझ्या टीमला कसं करमणार' असं म्हणत त्यांच्या पुनरागमनाचे संकेत दिले होते.
पंरतु, त्यानंतर सत्यजित तांबे यांनी ट्वीट (Tweet) करत 'उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी', असे म्हटले होते. या ट्वीटवरून सत्यजित तांबे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या होत्या. यानंतर आता स्वत तांबेंनी या ट्वीटवर स्पष्टीकरण दिले आहे.
ते म्हणाले की, ''मी काल एका शाळेच्या (School) वार्षिक स्नेहसंमेलनाला गेलो होतो. तिथे एका विद्यार्थ्याने कविता वाचली. ती कविता मला आवडली, म्हणून मी ते ट्वीट केलं. त्यातून वेगळा अर्थ काढण्याची काहीही गरज नाही.''असे आमदार (MLA) सत्यजित तांबेंनी म्हंटले आहे. त्यामुळे आता तांबे यांच्या या प्रतिक्रियेवरून त्यांचा सध्या तरी कुठल्याही पक्षात जायचा इरादा नसल्याचे दिसत आहे.