
मुंबई | Mumbai
निवडणूक आयोगाने (Election Commission) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला शिवसेना (Shivsena) पक्षासंबंधीचे अधिकार दिल्यानंतर शिंदे गट एकानंतर एक अशा शिवसेनेच्या कार्यलयांवर तसेच पदांवर ताबा घेत आहे. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) राज्यातील सत्तासंघर्षावर आजपासून सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे.
त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी गेल्या दोन दिवसांपासून दोन हजार कोटींच्या 'पॅकेज' बाबत दावा करून चर्चेची राळ उडवून दिली आहे. त्यानंतर आज राऊतांनी माध्यमांशी बोलताना शिंदे गटाकडून ठाकरे गटातील आमदार-खासदार आणि इतर पदाधिकाऱ्यांना खरेदी करण्यासाठी किती रुपये दिले जात होते, याचा दावा केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
यावेळी राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाचा निर्णय एकतर्फी आणि 'मेरी मर्जी' वाल्यांच्या मर्जीसाठी दिलेला निर्णय आहे. तसेच गेल्या ५ महिन्यांत २ हजार कोटींचा आरोप करताना याच्या परिणामांची आपल्याला पूर्ण कल्पना असल्याने आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असे राऊतांनी सांगितले. तसेच शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह हे दडपशाही, दबाव, पैसा, सत्ता यामाध्यमातून मिळवल्याचे राऊतांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, देशात राजकीय नेत्यांच्या खरेदी-विक्रीचं मोठं रेट कार्ड बनवलं असून मुंबईचा नगरसेवक खरेदी करायचा असेल तर २ कोटी आमदाराला ५० कोटी, खासदार ७५ कोटी आणि शाखाप्रमुखाला ५० लाख रुपये देण्यात येत असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. तसेच यासाठी मोठे एजंट देखील नियुक्त करण्यात आले असून शिवसेनेतून बाहेर पडलेला एक गट कमिशनवर काम करत असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.
तसेच तुम्ही कार्यालयांचा ताबा घ्याल. पण खवळून उठलेल्या लाखो शिवसैनिकांचा ताबा कसा घ्याल? त्यांना कसं शांत करणार? शिवसेना महाराष्ट्राचा आत्मा आहे, मराठी माणसाचा आवाज आहे. शिवसेना संपावी यासाठी दिल्लीश्वराने ६० वर्षांपासून प्रयत्न केले. ते आम्ही हाणून पाडले. आता काही लोकांना त्यात यश आलं असलं, तरी महाराष्ट्रातील (Maharashtra) जनता याविरोधात पेटून उठली आहे, असेही राऊतांनी नमूद केले.