मुंबई । Mumbai
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या घरावर ईडीने (ED) मुंबईसह पुणे आणि रत्नागिरी अशा एकूण सात ठिकाणी छापेमारी केली आहे. या कारवाईनंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, भाजपने (bjp) तपास यंत्रणांना हाताशी धरून अनिल परबांवर सूडबुद्धीने कारवाई केली असून शिवसेना (shivsena) परबांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. तसेच सरकारला त्रास देण्यासाठीच राजकीय दृष्टीने कारवाई केली जात असून महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi government) दबाव टाकण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर केला जात असल्याचे राऊतांनी म्हटले आहे.
राऊत पुढे म्हणाले की, भाजपने सूडाच्या भावनेने कितीही कारवाया केल्या तरी आमच्यावर कोणताही दबाव येणार नाही. सर्व निवडणुका सुरळीत पार पडतील, सरकार सुरळीत चालेल. अशा कारवायांमुळे भाजपा रोज खड्ड्यात जात आहे. महाराष्ट्रातील राजकारणाला इतके वाईट वळण गेल्या ५५ वर्षात कधी मिळाले नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, आमच्याकडेही भाजपच्या असंख्य लोकांविरोधात सबळ पुरावे आहेत. नवलानीला कोणी पळवले याचे उत्तर सबळ पुरावे आहेत म्हणणाऱ्यांनी द्यावे. तसेच मी सातत्याने तक्रार देत असून त्यावर साधे उत्तर येत नाही. विक्रांत घोटाळा (Vikrant scam) देशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचे मी मानतो. शौचालय घोटाळा अजून मोठ्या प्रमाणात समोर येईल.
माझ्यावर मानहानीचा दावा टाकला म्हणून मी माघार घेणार नाही. इतर काही प्ररकरणात आम्ही हात घातला आहे. आम्ही ईडीकडे फाईल पाठवली असून ती उघडून पाहण्याची तसदीही कोणी घेत नाही. आम्हीसुद्धा पाहून घेऊ,” असा इशारा यावेळी संजय राऊतांनी दिला आहे.