
नाशिक | Nashik
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) काल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून खासदार श्रीकांत शिंदेंनी आपल्यावर हल्ला करण्यासाठी ठाण्यातील गुंड राजा ठाकूरला सुपारी दिली असा खळबळजनक आरोप केला होता.
त्यानंतर आज एका कार्यक्रमासाठी संजय राऊत नाशिक (Nashik)दौऱ्यावर असून त्यांची सकाळी हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये (Hotel Express Inn) ठाणे (Thane) पोलिसांच्या पथकाने हल्ला करण्याच्या आरोपाप्रकरणी जबाब नोंदवला. यानंतर राऊतांनी माध्यमांशी संवाद साधत फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
यावेळी फडणवीसांवर टीका करतांना राऊत म्हणाले की, माझ्यावर हल्ला करण्यासाठी ठाण्यातील गुंड राजा ठाकूरला सुपारी दिल्याप्रकरणी मी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) कळवले. पंरतु, सुरक्षा मागितलेली नाही. मी बाळासाहेब ठाकरे स्कूलचा विद्यार्थी आहे, रामभाऊ माळगी प्रबोधिनीचा नाही, फडणवीस यांना मी सुसंस्कृत समजत होतो, आता नाही, असे राऊतांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्यावर हल्ल्याची भीती वाटते असे म्हणत पोलिसांना पत्र लिहिले. तर प्रज्ञा सातव यांच्यावर देखील हल्ला झाला. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ल्याची सुपारी दिली गेली आहे. फडणवीस गृहमंत्री असताना हे घडत असून राज्यात रोजच खून, दरोडे, बलात्कार होत आहेत. लोकप्रतिनिधीही सुरक्षित नाहीत, असे राऊत म्हणाले.
तसेच मला सनसनाटी आरोप निर्माण करायची गरज नाही. उलट फडणवीस हे अत्यंत बेफिकीरपणे वागत आहेत. ते इतरांच्या बुद्धीचे माप काढतात, मी त्यांच्या बुद्धीचे माप काढायला लागलो, तर गडबड होईल, असा इशारा देखील राऊतांनी यावेळी दिला.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, मला सुरक्षेची गरज नाही, उलट त्यांना सुरक्षा लागली, तर मी देईल. मी एकटाच फिरतो, लढतो. गृहमंत्रीपद हे जनतेला सुरक्षित करण्यासाठी हवे. फुटीर आमदारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सुरक्षा देण्यासाठी नव्हे. असे म्हणत त्यांनी फडणवीसांना टोला लगावला.