
मुंबई | Mumbai
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांसह सरकारला पाठिंबा देणार असल्याची जोरदार चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत सर्वच पक्षांकडून वेगवेगळे दावे केले जात असून खुद्द राष्ट्रवादीच्या (NCP) काही आमदारांनी (MLA) अजित पवारांना आपला उघडपणे पाठिंबा जाहीर केला आहे.
तसेच महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या कमालीचा संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र दिसत असतानाच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठा दावा केला आहे. त्यामुळे अजित पवार खरचं भाजपमध्ये (BJP) जाणार का? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
खासदार राऊत म्हणाले की, "मविआतील तिन्ही घटकपक्षांची आघाडी मजबूत आहे. याची भीती भारतीय जनता पक्षाला वाटत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. २०२४ पर्यंत ही आघाडी खिळखिळी करण्याचे त्यांचे कारस्थान आहे. शिवसेनेतून काही आमदार फोडले म्हणून शिवसेना फुटली का? आमदार गेले असतील. २०-२५ आमदार जाणे म्हणजे पक्ष खिळखिळा होणे असे नाही'', असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पक्ष फुटला का? आजही हा पक्ष शरद पवार या नावाशी बांधलेला आहे. बातम्या येतात ४० फुटले, ५० फुटले. अशा बातम्या म्हणजे अंतिम सत्य नाही. माझी पक्की माहिती आहे की ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत, अजित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसबाबत, त्या खोट्या आहेत. भाजपकडून त्यांच्याबाबत अफवा, वावड्या उठविण्यात येत असून लोकांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे तसे काहीही होणार नाही'', असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.