
नवी दिल्ली | New Delhi
आमदार राहुल कुल (MLA Rahul Kool) यांच्या कथित साखर कारखाना घोटाळाप्रकरणी राज्य सरकारने (State Government) त्यांना आज क्लीनचीट दिली. या प्रकरणाचे पुरावे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडं सुपूर्द केले होते, त्यामुळे क्लीनचीटनंतर राऊत यांनी संताप व्यक्त केला.
सरकार म्हणजे क्लीन चिट देणारा कारखाना आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच, भाजपा आणि राष्ट्रवादीतील इतर नेत्यांवरही राऊतांनी निशाणा साधला आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारला धारेवर धरले.
राऊत म्हणाले, "स्वतःच्या लोकांना धुऊन काढायचे, क्लीनचीट द्यायची हा यांचा जुना उद्योग आहे. मी सर्व पुरावे गृहमंत्र्यांकडे पाठवले आहेत. पण सर्व चौकशी समित्या यांच्याच आहेत. दौंड न्यायालयाने तक्रारदार नामदेव ताकवणे यांच्या तक्रारीला महत्त्व देऊन कारखान्याचे चेअरमन, लेखापरिक्षक यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यात काही तथ्य असल्याशिवाय न्यायालय आदेश देणार नाहीत. या कारखान्यातील त्रुटी, घोटाळ्यांची सविस्तर माहिती गृहमंत्र्यांना मी दिली आहे. सीबीआय आणि ईडीलाही माहिती पाठवली आहे. भ्रष्टाचार करणारा त्यांच्या पक्षाचा माणूस आहे, त्यामुळे आपण त्याला वाचवले पाहिजे, ही गृहमंत्र्यांची भूमिका आहे”, असे संजय राऊत म्हणाले.
तसेच, गृहमंत्र्यांना हा विषय पूर्णपणे माहीत नाही. भ्रष्टाचार करणारा माणूस हा त्यांच्या पक्षाचा माणूस आहे. त्यामुळे आपण त्याला वाचवले पाहिजे, इतकेच फक्त गृहमंत्र्यांना माहीत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. राहुल कुल यांना क्लीन चिट मिळणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्या कारखान्याच्या शेतकरी सभासदांशी बोलल्यानंतर लक्षात येईल की त्यांची कशा पद्धतीने लूट झाली आहे.
“दादा भुसे यांनी १७८ कोटींचा घोटाळा केला. यांनी क्लीन चिटचा कारखानाच उघडला आहे. अब्दुल सत्तारांनी घोटाळा केला. मी म्हणालो राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संस्थेला झाकीर नाईकने साडेचार कोटींची मदत केली. इक्बाल मिर्ची, दाऊद इब्राहिम यांच्याकडून काही व्यवहार झाल्याने आमचे काही लोक तुरुंगात आहेत.
प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप झाल्यानंतर ईडीने कारवाई केली, ते आता मोठे झाले. नवाब मलिक तुरुंगात आहेत. मग झाकिर नाईक यांच्याकडून पैसे मिळालेल गृहस्थ मंत्रिमंडळात कसे? विखे पाटील स्वतः सांगतात की चार कोटी नाही अडीच कोटीच मिळालेत”, असे संजय राऊत म्हणाले.