
मुंबई | Mumbai
भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी दिल्लीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय समाज पक्षाकडून (RSP)आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना "तुम्ही म्हणताय ताईची पार्टी ताईची पार्टी. माझी कुठली पार्टी? मी भाजपची (BJP)आहे. भाजप माझी थोडीच आहे. भाजप खूप मोठा पक्ष आहे. मी भाजपची होऊ शकते. पक्ष माझा होऊ शकत नाही. कारण तो मोठा पक्ष आहे" असे म्हणत पुन्हा एकदा स्वपक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर आता त्यांच्या या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) त्यांना सल्ला दिला आहे...
राऊत म्हणाले की, भाजप नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी शुन्यातून पक्ष मोठा केला. मात्र आज मुंडेंचे अस्तित्व राहू नये यासाठी भाजपमधून प्रयत्न होत आहेत. मुंडे कुटुंबाची राजकारणात वाताहत करण्याचा हा प्रयत्न आहे. आमच्यावर अन्याय होतोय या रडगाण्याला कोणी विचारत नाही, त्यामुळे आता पंकजा मुंडे यांनी कोणत्याही परिणामाची चिंता न करता निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भाजपने पंकजा मुंडे यांना २०१९ मध्ये विधानसभेसाठी उमेदवारी नाकारली होती. त्यावरून बरेच राजकीय तर्क-वितर्क लढवण्यात आले होते. खुद्द पंकजा मुंडेंनीही यावरून नाराजी (Upset) बोलून दाखवली होती. त्यानंतर त्यांच्यावर मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh) प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यानंतर आता दिल्लीत रासपच्या कार्यक्रमात केलेल्या विधानावरून पुन्हा एकदा त्या नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.