नाशिक । प्रतिनिधी
करोना महामारिमुळे अनेक विकास कामे खोळंबली असताना त्याचा मुंबई - नागपूर ही महाराष्ट्राची दोन टोक जोडणार्या समृध्दी महामार्गास देखील बसला आहे. जिल्ह्यातून तीन टप्प्यांमधून समृध्दीचा ९७ किलोमीटरचा मार्ग जात आहे...
त्यापैकी एका टप्प्याचे ३७ तर उर्वरीत दोन टप्प्याचे २० टक्केच्या आसपास काम पूर्ण झाले आहे. कामातील विलंबामुळे महामार्ग उभारणीचा खर्चात दामदुपट्ट वाढ झाल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील मागील भाजप सरकारचा समृध्दी महामार्ग हा महत्वकांक्षी प्रकल्प होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रिम प्रोजेक्ट होता. मुंबई ते नागपूर असा ७५० हून अधिक किलोमीटरचा हा महामार्ग आहे.
नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतरही या प्रकल्पाला स्थगिती न देता कामकाज सुरु ठेवले. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरि या तालुक्यातून महामार्गाचा ९७ किलोमीटरचा रस्ता जात आहे.
त्यासाठी जवळपास ९९ टक्के भूसंपादन पूर्ण झाला असून नव वर्षाच्या प्रारंभी काम दखील सुरु झाले. जिल्ह्यात महामार्गाच्या कामाचे फेज १२, १३ व १४ असे तीन टप्पे करण्यात आले आहे. फेज १२ मध्ये नगर ते सोनारी मध्ये ३७ टक्के काम पूर्ण झाले आहे. फेज १३ मध्ये सोनाइ ते इगतपुरी या फेजचे २०.८ टक्के काम झाले आहे.
तर इगतपुरितील तारांगण पाडा ते ठाण्यातील फुगळगाव हे काम १६. ४ टक्के काम पूर्ण झाले आहे. जानेवारीत काम सुरु झाल्यावर मार्चपर्यंत कामाने वेग घेतला होता. मात्र करोना संकट आल्यावर महामार्गाच्या कामावर त्याचा परिणाम झाला. करोनामुळे मजूर त्यांच्या गावी गेले. त्यामुळे कामकाज ठप्प पडले होते.
त्यानंतर पावसाळ्याला सुरुवात झाली. त्यामुळे देखील काम अतिशय संथ गतीने सुरु होते. आता करोना संकट कायम असले तरी जीवनमान पूर्वपदावर येत आहे. तसेच पावसाचा हंगाम संपत आला आहे. त्यामुळे पुढिल काळात समृध्दीचे कामकाज वेग घेईल अशी माहिती जिल्हाप्रशासनाने दिली आहे.