मुंबई | Mumbai
क्रिकेटचा देव अशी ख्याती असणारा भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर हा येत्या २४ एप्रिल रोजी वयाची ५० वर्ष पूर्ण करणार आहे. तेव्हा त्यानिमित्ताने वानखेडे स्टेडीयममध्ये सचिन तेंडुलकर याचा पूर्णा कृती पुतळा उभारण्याचा निर्णय मुंबई क्रिकेट असोसिएशनने घेतला आहे.
क्रिकेटमधून सचिनने निवृत्ती घेतल्यानंतर १० वर्षांनी हा निर्णय घेण्यात आला आहे. २४ एप्रिलला, तेंडुलकरच्या ५० व्या वाढदिवसाला किंवा वर्षाच्या अखेरीस ५० षटकांच्या विश्वचषकादरम्यान या पुतळ्याचे अनावरण केले जाईल, अशी माहिती सध्या समोर येत आहे. आज, वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकर आणि एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे, पुतळा कुठे ठेवायचा हे पाहण्यासाठी पोहोचले होते.
यावेळी बोलताना सचिन म्हणाला, 'माझ्यासाठी ही एक सुखद भेट आहे. मला याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. मी स्वतःच्याच पुतळ्याबाबत ऐकून अश्चर्यचकीत झालो आहे. माझी कारकीर्द याच मैदनावर सुरू झाली होती. या मैदानावर कधीही विसरली जाणार नाहीत अशा आठवणी जोडल्या गेल्या आहेत. मी माझ्या कारकिर्दीतील सर्वोच्च क्षण २०११ मध्ये याच मैदानावर अनुभवला होता. भारताने वर्ल्डकप जिंकला होता. सचिनने या मैदानावर आपला पुतळा बसवण्यात येणार ही गोष्ट खूप खास आहे.
सचिनने १६ नोव्हेंबर २०१३ रोजी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना त्याने वानखेडे स्टेडियमवर खेळला होता. यावेळी त्याने आपल्या गुरुजनांपासून ते क्रिकेटमधील सहकाऱ्यांपर्यंत सर्वांचे आभार मानले. सचिन तेंडुलकरने भारतासाठी २०० कसोटी सामने, ४६३ एकदिवसीय आणि एक टी-२० सामना खेळला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके (१००) आणि धावा (३४,३५७) करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे.
वानखेडे स्टेडियमवर प्रथमच खेळाडूचा पुतळा बसवला जात आहे. वानखेडे स्टेडियममधील एका स्टँडला सचिनचे नाव देण्यात आले आहे. भारतात खेळाडूंचे पुतळे फारसे नाहीत. भारताचे माजी क्रिकेटपटू सीके नायडू यांचे तीन पुतळे वेगवेगळ्या स्टेडियममध्ये आहेत. पहिला पुतळा विदर्भ क्रिकेट स्टेडियममध्ये, दुसरा आंध्रमध्ये आणि तिसरा इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये आहे. तथापि, अनेक खेळाडूंचे मेणाचे पुतळे आणि त्यांच्या नावावर स्टँड आहेत. मादाम तुसाद संग्रहालयात अनेक दिग्गज खेळाडूंचे पुतळे आहेत.