मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
करोना साथीचा (Corona) प्रादुर्भाव काहीसा कमी होऊ लागल्याने राज्यात पुढील आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्याचे समजते. निर्बंध कशा पद्धतीने शिथिल करण्यात यावेत याचा एक सविस्तर अहवालच (Report) टास्क फोर्सने (Task Force) मुख्यमंत्र्यांना पाठवला असून यावर सखोल चर्चा होऊन टप्प्याटप्प्याने हे निर्बंध हटवण्यात येणार आहेत…
हे निर्बंध शिथिल करताना पहिल्या टप्प्यात हॉटेल, रेस्टारंट आणि दुकानांच्या वेळा वाढवून दिल्या जाणार असल्याचे समजते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत 7 जुलै रोजी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली होती.
त्यानंतर लगेचच 9 जुलै रोजी राज्य आपत्कालीन विभागातील अधिकार्यांसोबतही मुख्यमंत्र्याची बैठक पार पडली. राज्यातील निर्बंध शिथिल करण्यासाठी या दोन बैठकांमध्ये महत्वाची चर्चा झाली होती.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्य टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर आणि वरीष्ठ अधिकार्यांकडून निर्बंध शिथिल करण्याबाबत एक सविस्तर अहवाल मागितला होता. राज्यातील पॉझिटीव्हिटी दर, बेडसची संख्या आणि इतर काही निकषांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला असून तो मुख्यमंत्री कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
या अहवालावर सविस्तर चर्चा होऊन येत्या आठवड्याभरात निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.