राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांना दिलासा; मंत्रीमंडळ बैठकीत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन (Pension of Freedom Fighters) दुप्पटीने वाढविण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे आता स्वातंत्र्य सैनिकांना १० हजार रुपयांऐवजी दरमहा २० हजार रुपये निवृत्ती वेतन मिळेल. भारतीय स्वातंत्र्य संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम आणि गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांना याचा लाभ मिळणार आहे.

या निवृत्तीवेतनात वाढ करण्याची मागणी वारंवार होत होती. यासाठी वार्षिक अंदाजे ७४.७५ कोटी रुपये इतका अधिक खर्च येईल. या निवृत्तीवेतन वाढीचा राज्यातील ६ हजार २२९ स्वातंत्र्य सैनिकांना लाभ होईल.

भारतीय स्वातंत्र्य लढा, हैद्राबाद मुक्ती संग्राम, गोवा मुक्ती संग्राम अशा देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी दरमहा निवृत्तीवेतन देण्याची योजना राज्य सरकारने १९६५ पासून सुरु केली आहे. त्यानुसार २ ऑक्टोबर २०१४ पासून दर महिन्याला १० हजार रुपये इतके निवृत्तिवेतन देण्यात येते होते. आता हे निवृत्तीवेतन दुप्पट करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *