Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याशेतकर्‍यांना दिलासा; शेतमालासाठी विशेष रेल्वे सुरू

शेतकर्‍यांना दिलासा; शेतमालासाठी विशेष रेल्वे सुरू

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

कोळसा वाहतुकीसाठी किसान ट्रेन ( Kisan Train )गेल्या काही महिन्यांपासून बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा व शहरातील शेतकर्‍यांचे रोजचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यांची गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे बोर्डाने स्पेशल पार्सल ट्रेन सुरु ( Special Parcel Train )केली असल्याची माहिती भुसावळ विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक शिवराज मानसपुरे यांनी दिली.

- Advertisement -

देवळाली कॅम्प ते मुझ्झफरपूर (बिहार) दरम्यान ही स्पेशल पार्सल ट्रेन आज नाशिकरोडला येताच तिचे स्वागत करण्यात आले. दर आठवड्याला मंगळवारी आणि शनिवारी ही गाडी धावेल. पार्सल ट्रेन 15 डब्यांची असून तिला मिळणारा प्रतिसाद पाहून फेर्‍यांचे दिवस वाढविण्यात येणार असल्याचे मानसपुरे यांनी सांगितले. पार्सल ट्रेनमुळे मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार येथे कमी खर्चात शेतीमाल पाठवून मालाला चांगली किमत मिळवणे शेतकर्‍यांना शक्य होणार आहे. प्रवासी रेल्वे गाड्यांप्रमाणेच ही पार्सल ट्रेन वेळेत व वेगात निर्धारीत स्थळी पोहचणार आहे. त्यामुळे गाडीव्दारे माल पाठविणार्‍या ग्राहकांना चांगली वाहतूक सेवा मिळणार आहे.

शेतकर्‍यांचा दूध, भाजीपाला, फळभाज्यासारख्या नाशवंत वस्तू तर उद्योजकांना औद्योगिक वस्तू, नागरिकांना खासगी पार्सल या ट्रेनद्वारे पाठवता येणार आहे. किसान ट्रेनला विशेष अनुदान असल्यामुळे शेतीमाल पाठविणार्‍यांचा दुहेरी फायदा व्हायचा. एकतर पिकाला परराज्यातही चांगला भाव मिळायचा तसेच माल पाठविण्यासाठी अनुदान मिळायचे. मात्र, किसान ट्रेन बंद ठेवल्याने या फायद्यापासून शेतकरी वंचित आहेत. नवीन पार्सल ट्रेनचा वेग व सेवा चांगली असली तरी यातून माल पाठविण्यासाठी भाड्यात कोणतीही सूट किंवा सरकारचे अनुदान नाही. त्यामुळे पार्सल ट्रेनला शेतकर्‍यांचा प्रतिसाद कमी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कार्टिंग एजेंट कमेलश मोगल, भास्कर नरवडे, रमेश चावला यांनी सांगितले की, पार्सल ट्रेन सकाळी 11 वाजता सुटणार आहे. नाशिकरोडला माल रात्री येऊन पडणार असल्याने सकाळपर्यंत तो खराब होऊ शकतो. त्यामुळे पार्सल ट्रेन रात्री 11 वाजता सोडावी. किसान ट्रेनला 50 टक्के अनुदान होते. पार्सल ट्रेनमध्ये शेतकर्‍यांना 20 ते 25 टक्के अनुदान दिल्यास व गाडी आठवड्यातून किमान तीन दिवस चालवल्यास शेतकर्‍यांना न्याय व रेल्वेला मोठा महसूल मिळेल. किसान ट्रेन बंद असल्याने सध्या प्रवासी गाड्यांच्या सामानाच्या बोगींमधून शेतीमाल पाठवला जातो.

मात्र, हे डबे खासग्या कंपन्या मुंबईतच बुक करतात. त्यामुळे नाशिकच्या शेतीमालाला जागा राहत नाही. पार्सल ट्रेनमुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारला शेती माल जाईल. तथापी, दिल्ली व कोलकात्यासाठी पार्सल ट्रेन नाही. तेथे चांगली मागणी असूनही शेती माल पाठवता येत नाही. दिल्ली व कोलकात्यासाठी आठवड्याला तीन गाड्या धावतात. त्यातील शेती व अन्य सामानाचे डबे मुंबईतच भरतात. त्यामुळे नाशिकच्या शेतकर्‍यांच्या मालासाठी जागाच राहत नाही. या गाड्यांमध्ये नाशिकसाठी किमान एक डबा राखीव ठेवल्यास व गाडी नाशिकरोडला पाच मिनिटे थांबल्यास शेतकर्‍यांना गाडीला प्रतिसाद वाढेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या