दिल्ली | Delhi
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरींग कमीटीची बैठक गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. त्यानंतर आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी नवीन वर्षातील बँकेचे पहिले पतधोरण जाहीर केले.
रिझर्व्ह बँकेने व्याजदरात (रेपो रेट) ०.२५ बेस पॉईंटने वाढ जाहीर केली असून यासह केंद्रीय बँकेचा व्याजदर ६.५% वर पोहोचला आहे.अशा परिस्थितीत वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य कर्जदारांना आज आणखी एक धक्का बसला आहे. मागील ७ महिन्यांत सहाव्यांदा ही रेपो रेट मध्ये वाढ करण्यात आली आहे.
पतधोरण समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आर्थिक वाढ, जीडीपी आणि महागाई यावर भाष्य केलं. दास म्हणाले, जीडीपी वाढीचा दर हा ६.४ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यांपैकी पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ६.२ टक्के तिसऱ्या तिमाहीत ६ टक्के तर चौथ्या तिमाहीत ५.८ टक्के राहिल असंही त्यांनी म्हटलं आहे.
तर यंदाच्या २०२३-२४ च्या आर्थिक वर्षात महागाई ६.५ टक्के राहण्याचा अंदाज आहे. तर यंदा पाऊस सर्वसामान्य राहिला तर सीपीआय महागाई ५.३ टक्के राहण्याचा अंदाज आहे, असंही दास यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
जागतिक पातळीवरील आर्थिक स्थिती ही काही महिन्यांपूर्वी होती तशी निराशाजनक नाही. मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये चांगली वाढ दिसून आली आहे. महागाईचा दर कमी होत असला तरी अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांचा विचार करता महागाईचा दर हा चिंतेचा विषय आहे, असंही शशिकांत दास यांनी म्हटलं.
मागील तीन वर्षांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे जागतिक स्तरावरील पतधोरणावर परिणाम झाला आहे. विकासनशील अर्थव्यवस्थांना व्यापारामध्ये या काळात मोठा फटका बसल्याने आर्थिक व्यवहार आणि महागाईवर नियंत्रण ठेवण्यास प्राधान्य देण्यात आल्याचं दिसून आलं, असं दास यांनी म्हटलं आहे.
यामुळे होम लोनपासून ते ऑटो आणि पर्सनल लोनपर्यंत सर्व काही महाग होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त ईएमआय भरावा लागेल. मंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर एमपीसीची ही पहिलीच बैठक आहे. यापूर्वी डिसेंबरमध्ये झालेल्या बैठकीत व्याजदर ५.९०% वरून ६.२५% करण्यात आले होते.