नवी दिल्ली
आर्थिक संकटात सापडलेल्या लक्ष्मी विलास बँकेवर (Laxmi Vilas Bank) आरबीआयने बुधवारी निर्बंध लादले आहेत. या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली आहे. नाशिकमध्ये या बँकेची शाखा आहे.
लक्ष्मी विलास बँकेत १६ डिसेंबरपर्यंत खातेदारांना महिनाभरासाठी केवळ २५ हजारांची रोख रक्कम काढता येणार आहे. मागील तीन वर्षांपासून बँकेची परिस्थिती खराब होती. बँक सातत्याने तोट्यात होती. ३० सप्टेंबरच्या तिमाहीत बँकेला ३९६.९९ कोटी रुपये तोटा झाला. बँकेच्या बुडीत कर्जात मोठी वाढ झाली आहे. एनपीए २४.४५ टक्के आहे.
व्ही.एस. रामलिंगा चेट्टीर यांच्या अध्यक्षतेखाली तामिळनाडूतील सात उद्योजकांनी एकत्रित येत लक्ष्मी विलास बँकेची स्थापना १९२६ मध्ये केली होती.रिझर्व्ह बँकेने केलेल्या शिफारसीनुसार केंद्र सरकारने लक्ष्मी विलास बँकेवर निर्बंध घातले आहेत.
डीबीएसमध्ये विलीनकरणाची तयारी
रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी विलास बँकेला सिंगापूरच्या डीबीएस बँक इंडिया या कंपनीत विलीन करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यासाठी डीबीएस बँकेने २५०० कोटींची भांडवली गुंतवणूक करण्याची तयारी केली आहे. विलीनीकरणामुळे डीबीएस समूहाला भारतात बँकिंग परवाना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इंडियाबुल्समध्ये बँकेचे विलीनीकरणाची तयारी झाली होती. परंतु आरबीआयची परवानगी मिळाली नाही.
जाणून घ्या बँकेचा इतिहास
3 नोव्हेंबर 1926 रोजी बँकेस इंडियन कंपनीअॅक्टनुसार व्यवसाय करण्यास परवानामिळाला.
19 जून 1958 रोजी आरबीआयने बँकिंग परवाना दिला.
बँकेचा व्याप वाढल्याने 11 ऑगस्ट 1958 रोजी शेड्युल्ड कमर्शियल बँकेत रुपांतर झाले.
बँकेने 30 सप्टेंबर 2020पर्यंत देशात तब्बल 573 शाखांचे जाळे विणले आहे. यामध्ये 7 कमर्शियल बँकिंग शाखेसह एका सॅटेलाईट शाखेचा समावेश आहे.
देशातील सर्व शाखांचे नियंत्रण करण्यासाठी बँकेची 7 विभागीय कार्यालयेही कार्यान्वितआहेत.
देशात बँकेची ब वर्गाच्या 569 शाखा आहेत.
खातेदारांच्या सोयीसाठी देशभर बँकेची तब्बल 1046 एटीएम आहेत.
देशातील 16 राज्यांसह 3 केंद्रशासित प्रदेशांत बँकेचा विस्तार झालेला आहे.
30 सप्टेंबर 2020पर्यंत बँकेत 20 हजार973 कोटींच्या ठेवी होत्या.
30 सप्टेंबर 2020पर्यंत बँकेची एकूण उलाढाल 37 हजार 595 कोटी रुपये होती.