Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यारेशन दुकानदार संपावर; मंत्रिमंडळात निघणार तोडगा

रेशन दुकानदार संपावर; मंत्रिमंडळात निघणार तोडगा

नाशिक । प्रतिनिधी

विना थम्ब रेशन वितरणाची परवानगी द्यावी व करोना संकटात रेशन दुकानदारांना 50 लाखांचे विमा कवच द्यावे या मागणीसाठी राज्यातील 55 हजार दुकानदार संपावर गेले असून अन्नधान्य वाटप ठप्प झाले आहे. बुधवारी (दि.5) मंत्रीमंडळाची बैठक होणार असून या संपाबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

दरम्यान या संपामुळे प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेअंतर्गत मे व जुनसाठी वाटप करण्यात येणार्या मोफत पाच किलो अन्नधान्याचे वाटप थांबले असून त्याचा सर्वाधिक फटका हा गोरगरिबांना बसला आहे.

रेशन दुकानदार संघटनेने राज्य शासनाविरुध्द दंड थोपाटले असून करोनामुळे मृत्यमुखी पडलेल्या रेशन दुकानदारांना आर्थिक मदत द्या व विमा संरक्षण कवच हवे, अशी मागणी करुन ती मान्य न झाल्यास येत्या 1 मे पासून धान्य वाटप बंद करत संपावर जाण्याचा इशारा दिला होता. पण शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले.

करोनाच्या संकट काळात मोफत धान्य वाटप करतांना मृत्यूमुखी पडलेल्या दुकानदारांना आर्थिक मदत तसेच शासनाकडून विमा कवच मिळावे अशी मागणी वारंवार करूनही शासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. राज्यात 55 हजार स्वस्त धान्य दुकानदार असून त्यांनी करोना संकट काळात शासनाची मोफत धान्य योजना रेशनकार्डधारकांपर्यंत पोहचविली.

शासनाकडून कोणतेही विमा कवच, करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या परवानाधारकांना कोणतीही आर्थिक मदत न मिळताही रेशन दुकानदारांनी त्याचे कर्तव्य बजावत सहकार्याची भूमिका घेतली. मध्यंतरी शासनाने रेशन दुकानधारकांना विमा कवच देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र अद्याप हा प्रस्ताव धूळखात पडला आहे. या मागणीबरोबरच स्वस्त धान्य दुकानदारांना शासकीय कर्मचार्‍याचा दर्जा किंवा फुड प्रोग्राम अंतर्गत 270 रुपये प्रती क्विंटल प्रस्तावित केल्यप्रमाणे कमीशन मार्जीन देण्यात यावे,

रेशनदुकानदारांना विमा संरक्षण व मृत्यूमुखी पडलेल्या परवानाधारकांच्या कुटूंबियांना शासकीय नोकरी व राजस्थान सरकारप्रमाणे 50 लाखांची आर्थिक मदत घोषित करावी, धान्य वाटप करतांना प्रतीक्विंटल एक ते दीड किलो येणारी घट ग्राह्य धरण्यात यावी, शासकीय धान्य गुदामातून स्वस्त धान्य दुकानदारांना 50 किलो 590 ग्रॅम वजनाचे कट्टे देण्यात यावेत, दुकानदारांना दुकानभाडे, वीजबील, स्टेशनरी खर्च देण्यात यावा, ई-पॉझ मशीन बदलून मिळाव्यात, मोफत धान्य वितरणाचे राहीलेले कमीशन देण्यात यावे, दुकानदारांनी दिलेली हमालीची रक्कम वाहतूक कंत्राटदाराकडून देयकातून वसूल करावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आलेल्या आहेत.

तसेच करोना महामारीमुळे समुह संसर्ग होऊ नये म्हणून शिधापत्रिकाधारकांचा थम न घेता दुकानदाराचा एप्रिलपासून थम घेऊन धान्य वाटप करण्याचे आदेश देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. संपाबाबत मंत्रिमंडळात काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या