
मुंबई | Mumbai
आज (दि.०२ ऑक्टोबर) रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जयंती असून त्यानिमित्ताने देशभरात वेगवेगळ्या प्रकारे देशवासियांकडून महात्मा गांधींना अभिवादन केले जात आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांनी दिल्लीत राजघाट (Rajghat) येथे जाऊन महात्मा गांधींना अभिवादन केले. तर काही मान्यवरांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) देखील सोशल मीडियावर पोस्ट करत महात्मा गांधींना जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. तर मनसे रिपोर्ट या एक्स हँडलवर राज ठाकरेंची ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे...
राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आज महात्मा गांधीजींची जयंती. व्यक्तिगत ते सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेसाठीचा आग्रह, स्वच्छ, निर्मळ मन आणि अर्थात स्वच्छ हेतू याच्या सहाय्याने त्यांनी हिंदुस्थानाला स्वातंत्र्याची दिशा नाही दाखवली तर जगाला अनेक शतकं प्रेरणा दिली. जगातील लोकप्रिय नेते गांधीजी होते का किंवा आहेत का? असतीलही किंवा नसतीलही. पण आज देखील त्यांचे अनुकरण करावे असे जगातील लाखो करोडो लोकांना वाटते, इतके संचित मागे ठेवून गेलेल्या ह्या महापुरुषाच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) विनम्र अभिवादन", असे राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
तसेच मनसे रिपोर्ट या एक्स (ट्विटर) हँडलवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असे नेतृत्व असेल की जे देशांच्या सीमा तोडून पसरत गेले. तेही इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल नसताना. गांधीजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की फक्त भारतातच नव्हे, तर जवळपास तीन खंडांतील देशांमध्ये स्वातंत्र्याची आस जागृत झाली आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला. पण जे गांधीजींना जमले, ते पुढे जवळजवळ कोणालाच जमलं नाही", असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मनसे रिपोर्ट या एक्स (ट्विटर) हँडलच्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, "विशिष्ट राजकीय-सामाजिक परिस्थितीत प्रबळ वाटणारे नेते आले. कमालीचे लोकप्रिय झाले आणि पुढे काही वर्षांतच मागे पडलेले दिसले. दुसरे महायुद्ध जिंकल्यावर चर्चिल जगाला फॅसिझमच्या विळख्यातून सोडवणारा तारणहार म्हणून पुढे आले. पण त्यांची लोकप्रियता पुढे झपाट्याने ओसरली. याला कारण चर्चिल यांचे योगदान एका विशिष्ट परिस्थितीला पूरक होते. ते चिरकाल टिकावे असं नव्हतं. पण गांधीजींचे तत्वज्ञान व्यापक होते ", असेही यात म्हटले आहे.
पुढे मनसे रिपोर्ट या एक्स (ट्विटर) हँडलच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "शृंखला, मग त्या अज्ञानाच्या असोत की गुलामगिरीच्या, वसाहतवादाच्या की जातींच्या, त्या शृंखलांनी कुठल्याही माणसाला बांधून ठेवण्याचा अधिकार कुणालाच नाही. कारण सगळी माणसं ही मुळात समान आहेत, इतकं सोपं तत्व त्यांनी स्वीकारलं आणि त्यासाठी त्यांनी संघर्ष केला. हे खूप कठीण आणि दुर्मिळ आहे. म्हणूनच गांधीजींसारखं बहुदा दुसरं कुणी होणे नाही", असेही सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.