नाशिक । प्रतिनिधी
राज्यात सर्वदूर बरसणार्या पावसाचे नाशिक शहर व जिल्ह्यातही आगमन झाले आहे. गुरुवारी (दि.६) मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. दिंडोरी, ईगतपुरी, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पावसाचा जोर जादा होता.
त्यामुळे धरण साठयात भर पडली असून पिकांनाही संजीवनी मिळाल्याने बळीराजा सुखावला आहे. हवामान खात्याने ९ आॅगस्टपर्यंत अतिवृष्टिचा इशारा दिला आहे.
मुंबईसह उपनगरिय परिसरात जोरदार बॅटिंग सुरु आहे. कोकण, मराठवाडा व विदर्भातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
उत्तर महाराष्ट्रात व प्रामुख्याने नाशिकमध्ये उशीराने का होईना बुधवारपासून (दि.६) पावसाचे आगमन झाले. इगतपुरीत ४६, त्र्यंबकला २३, दिंडोरी ७७, पेठ ४६, निफाड ५७ मिमी इतका समाधानकारक पाऊस झाला. गुरुवारी (दि.६) देखील पावसाने हजेरी लावत जिल्हावासियांना दिलासा दिला. शहर परिसरात हलका ते मध्यमस्वरुपाचा पाऊस पडला.
जिल्ह्यात इतर ठिकाणी तुलनेने पावसाचा जोर अधिक होता. सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु होती. अधूनमधून विश्रांती घेत पावसाच्या सरी कोसळत होत्या. असा पाऊस पिकांसाठि लाभदायक मानला जात आहे.