मुंबई | Mumbai
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी केलेल्या कथित अवमानकारक विधानाचे तीव्र पडसाद आज (गुरुवारी) विधानसभेत उमटले.
या मुद्द्यावरून विधानसभेत (vidhansabha) सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. दरम्यान, शिवसेना (shivsena) नेते, आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik), संजय शिरसाट व भाजप नेते आशिष शेलार यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधींनी माफी मागावी अशी, मागणी केली.
यावेळी विधानसभेत मोठा गदारोळ झाल्यामुळे, सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते. आजच्या कामकाजाच्या वेळी विधानसभेतील प्रश्नोत्तराचा तास संपताच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सभागृहात राहुल गांधी यांच्या सावरकरांसंबंधीच्या कथित अवमानकारक विधानाचा मुद्दा मांडला.
ते म्हणाले की, 'आम्ही लहानपणापासूनच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या शौर्याचे धडे वाचले. पण काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी वारंवार त्यांचा अवमान करत आहेत. भारत जोडो यात्रेतही त्यांनी त्यांच्याविरोधात अपशब्द वापरले. आम्ही हा अवमान सहन करणार नाही. त्यांच्या विधानाचा आम्ही निषेध करतो.'
भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनीही यावेळी राहुल गांधींच्या माफीची मागणी केली. ते म्हणाले - 'राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारताचा अवमान केला. तसेच भारतीय स्वातंत्र्यासाठी अहोरात्र कष्ट उपसणाऱ्या सावरकरांचाही अवमान केला.
त्यामुळे त्यांनी माफी मागितली पाहिजे.' यावेळी सत्ताधारी भाजप व शिवसेनेच्या आमदारांनी सभागृहात राहुल गांधींविरोधात जोरदार नारेबाजी केली. यामुळे विधानसभेचे वातावरण काही वेळेसाठी तापले होते.