Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यापालकमंत्र्यांच्या घरासमोर आज तीव्र आंदोलन

पालकमंत्र्यांच्या घरासमोर आज तीव्र आंदोलन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्हा बँकेने (NDCC Bank )62 हजार थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया(Land auction process ) सुरू केलेली आहे.याविरोधात नाशिक जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीच्यावतीने सोमवारी (दि.16 ) मालेगाव येथे पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर सर्वपक्षीय बिऱ्हाड आंदोलन पुकारले आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.१५)रात्री उशिरापर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व पालकमंत्री दादा भुसे यांच्यात चर्चा झाली. मात्र, शासन स्तरावरून जोपर्यंत अधिकृत ठाम निर्णय व आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा या बैठकीनंतरही राजू शेट्टी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला.

ते म्हणाले,62 हजार शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतले आहे, त्यावर सहा टक्के आकारणी करावी. मूळ मुद्दल व सहा टक्के व्याज वन टाइम सेटलमेंटचा प्रस्ताव आम्ही दिला आहे. तो जर बँकेने स्वीकारला तर सर्व शेतकरी कर्ज भरण्यास तयार आहेत. आरबीआयने देखील स्पष्ट कळविले आहे की, वन टाइम सेटलमेंट करावी व सक्तीची वसुली थांबवावी.

ठेवी गोळा करून ते पीक कर्जाला दिल्यामुळे ठेवीवरील व्याजाची रक्कम जास्त व कर्जाची रक्कम कमी आली.त्यामुळे अनिष्ट दुरावा निर्माण झाला आहे. बँक बंद पडावी, ती बुडावी अशी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भूमिका कदापी नाही. मूळ कर्जाच्या चौपट ते साडेचार पट रक्कम भरावी लागते. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. धनदांडग्यानी बँकेच्या धोरणाच्या पलीकडे जाऊन व तारण ठेवलेल्या किमती पेक्षाही पलीकडे जाऊन कर्ज उचलले आहे. हे अन्यायकारक असल्याचे राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले.

या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप , शेतकरी नेते अनिल धनवट , ललित बहाळे , अर्जुन बोराडे हे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत,अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली.

जिल्हा बँकेने 62 हजार थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया सुरू केलेली आहे.शेतकऱ्यांनी जेवढं कर्ज घेतलं त्याच्या अनेक पट या बँकेने व्याज लावल्यामुळे शेतकऱ्यांची मुद्दल आणि व्याज हे जमिनीच्या किमतीपेक्षा देखील जास्त झाले आहे. सतत अवकाळी, करोना, पडलेले बाजार भाव यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त आहेत .त्यात जिल्हा बँकेने आवाजावी व्याज लावून शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे.

शेतकऱ्यांना वाढलेलं कर्जफेड करणे अशक्य असल्यामुळे आज जिल्हा बँकेने या शेतकऱ्यांच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. नाशिक जिल्ह्यातले साधारणता 50 हजारापेक्षा जास्त शेतकरी हे भूमिहीन होणार आहे.या विरुद्ध नाशिक जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीने 16 तारखेला पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर बिऱ्हाड आंदोलन पुकारले आहे.

सरकारने राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे ओटीएस करण्याचे आदेश जिल्हा बँकेला द्यावे. मुद्दल अधिक योग्य व्याज घेऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे.या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन होणार आहे. न्याय मिळेपर्यंत तिथून आम्ही उठणार नाही. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिला आहे.

धन दांडग्यांनी या ठिकाणी कर्ज घेतले असून केवळ सर्वसामान्य शेतकऱ्यांकडेच वसुली का ? वसुली ही सर्वांकडे समानच झाली पाहिजे

– दादा भुसे, पालकमंत्री

आमचा मोर्चा स्थगित झालेला नाही. सोमवारी (दि.१६) वणी पासून तो पुढे जाणार आहे. या संदर्भात पालकमंत्री यांनी सहकार मंत्र्यांशी चर्चा करून पुढील निर्णय होईल असे सांगितले आहे.

– राजू शेट्टी,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते

60 हजार शेतकऱ्यांच्या जमिनी वाचाव्यात

जिल्हा बँकेने 62 हजार शेतकऱ्यांच्या कर्जाला आवाजवी व्याज लावून डोंगराएवढे कर्ज केले आहे. अस्मानी सुलतानीमुळे अडचणीतल्या शेतकऱ्याला हे कर्ज फेडणे शक्य नाही. यामुळे या शेतकऱ्यांच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकरी कर्जमाफी मागत नाही फक्त राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे शेतकऱ्यांना ओटीएस योजना द्यावी. यासाठी सरकारने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे.सरकारने 60 हजार शेतकऱ्यांच्या जमिनी वाचाव्यात .

– संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

- Advertisment -

ताज्या बातम्या