नवी दिल्ली
केंद्र सरकारने तीन नवे कृषी कायदे केले आहेत. त्याविरोधात महिन्याभरापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील शेतकऱ्यांशी ८० मिनिटे संवाद साधला. त्यातील २० मिनिटे केवळ आंदोलनावर बोलले.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद झाल्यानंतर मोदींनी शेतकऱ्यांना उद्देशून भाषण केले. यावेळी त्यांनी केलेल्या भाषणातील १० महत्वाचे मुद्दे
१) केंद्र सरकारच्या कृषी योजनांचा पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. बंगाल राज्य सरकार राजकीय कारणांमुळे हा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू देत नाही.
२) नव्या कायद्यामुळे शेतकरी त्यांचे उत्पादन हवे तिथे विकू शकतात. जिथे तुम्हाला चांगला मोबदला मिळेल, तिथे तुम्ही पिकवलेली वस्तू विका. शेतकऱ्यांना हे स्वातंत्र्य मिळत असेल तर त्या सुधारणांमध्ये चुकीचे काय आहे?
३)कृषी कायद्यामुळे बाजारपेठ आणि एसएसपी पद्धत जाईल अशी अफवा पसरवली जात आहे. नवे कृषी कायदे शेतकऱ्याला बळ देणारे आहेत. शेतकऱ्याला वाटले तर तो करार रद्द करु शकतो पण करार करणारी कंपनी असा एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही.
४)आज दिल्लीवरुन रुपया निघतो, तेव्हा तो त्या व्यक्तीच्या खात्यात जमा होतो. पुर्वी पुर्ण रुपये जात नव्हते, आज माजी पंतप्रधानांनी जाहीरपणे सांगितले. संगणकाच्या एका क्लिकवरुन नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा झाले. यात कुठला कट नाही, हेराफिरी नाही.
५)आधीच्या सरकार राजकारण्यांनी इतकी वर्ष सत्ता उपभोगली पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही केले नाही. त्यांना त्यांच्या परिस्थितीवर सोडून दिले. गरीब शेतकरी अजून गरीब झाला. स्वामीनाथन आयोगाचा अहवाल त्यांनी दाबून ठेवला होता.
६) आमच्या सरकारने नव्या धोरणाने काम सुरु केले. शेतकऱ्याला भविष्याच्या दृष्टीने तयार करण्यावर भर दिला. जगामध्ये काय नवे घडतेय, त्याची माहिती घेतली. सखोल अभ्यास केला आणि त्या दृष्टीने काम केले.
७) छोटया शेतकऱ्यांनाही किसान क्रेडिट कार्ड दिले जात आहे. आयुष्मान योजनेमुळे शेतकऱ्याचे जीवन सुधारले. अडीज कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळाले.
८) कृषी सुधारणांवरुन खोटी माहिती पसरवली जात आहेत. एमएसपी किंमतीला तुम्हाला पीक विकायचे असेल तर तुम्ही कुठेही विकू शकता बाजार समित्या बंद होणार नाही.
९) नुकतेच जम्मू-काश्मीर, राज्यस्थानमध्ये पंचायत निवडणुका झाल्या. त्यात सर्वात जास्त मतदान करणारा वर्ग म्हणजे शेतकरी होता. त्यांनी दोन्ही भाजपवर विश्वास दाखवला
१०) शेतमाल विकत घेणाऱ्यास आता पावती द्यावी लागेल आणि तीन दिवसांत शेतकऱ्यांचे पैसे द्यावे लागतील.