
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर भाजपविरोधातील सर्व विरोधीपक्षांची बैठक आज पाटण्यामध्ये (Patna) पार पडली. या बैठकीत विरोधकांची पुढची रणनीती काय असेल, यासह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर विरोधी पक्षांची (Opposition Parties) एकत्रित पत्रकार परिषद झाली. त्यावेळी सर्व महत्त्वाच्या नेत्यांनी आपली भूमिका मांडली...
यावेळी बोलताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) म्हणाले की, सर्व पक्षांनी भाजपविरोधात एकत्र निवडणूक लढविण्याचे ठरवले असून सर्व विरोधी पक्षांची येत्या काही दिवसांत आणखी एक बैठक होईल. या बैठकीचे आयोजन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे करतील. या बैठकीत विरोधकांच्या अजेंड्याला अंतिम स्वरुप येईल. तसेच सध्या देशात जे सत्ताधारी आहेत ते देशाच्या हिताच काम करत नाही, अशी टीकाही नितीश कुमार यांनी केली.
तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) म्हणाले की, "सर्व नेते एकत्र येऊन पुढे निवडणूक लढवण्यासाठी कॉमन अजेंडा तयार करत आहोत. यासाठी पुढची बैठक १२ जुलै रोजी शिमल्यात होईल. त्यावेळी सर्व नेत्यांचे मत विचारात घेऊन मग तारीख निश्चित होईल. तसेच पुढच्या बैठकीत आम्ही एकत्र बसून एक अजेंडा तयार करु. त्यावेळी कोणकोणत्या विषयांवर आम्ही निर्णय घेऊ शकतो आणि पुढे कशाप्रकारे लढायला हवे, यावर सर्वतोपरी विचार करुन रणनीती बनवण्यावर आम्ही चर्चा करणार आहोत.
राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, या बैठकीस सर्व पक्षाचे वरिष्ठ नेते आले असून मी त्यांचे स्वागत करतो. नितीश कुमार यांनी आज जेवणात बिहारचे सर्व खाद्य पदार्थांची चव चाखायला दिली. त्यासाठी धन्यवाद. भारताच्या मूळ गोष्टीवर आक्रमण होत असून ही विचारधारेची लढाई आहे. यासाठी आपण सर्व एकत्र उभे आहोत'', असे त्यांनी म्हटले. तसेच आमच्यात जरुर काही मतभेद असू शकतात. पण आम्ही फ्लेक्सिबिलीटीने एकत्र काम करु. आम्ही आमच्या विचारधारेचे रक्षण करण्याचे ठरवले असून पुढच्या बैठकीत आणखी खोलवर चर्चा करु", असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, देशात आज अनेक समस्या आम्ही बघत आहोत. आम्ही सर्वांनी एकत्रपणे पुढे जाण्याचे ठरवले आहे. पाटण्यात जे सुरु झालंय ते पुढे घेऊन जाईल याचा मला विश्वास आहे. देशातील अनेक आंदोलन पाटण्यातून सुरु झाली आहेत. देशाची जनता आमचे समर्थन करणार याचा मला विश्वास आहे, असे पवारांनी म्हटले.
ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नेते आले आहेत. आमच्या विचारधारा वेगळ्या आहेत, मतभिन्नता असू शकेल, पण देशाची अखंडता कायम ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. देशाच्या प्रजातंत्रावर आघात करेल, त्याचा आम्ही विरोध करू. आम्ही स्वत:ला विपक्ष मानत नाही. देशात तानाशाही आणणाऱ्यांविरोधात आम्ही राहू. सुरूवात चांगली होते त्याचा शेवटही चांगला होईल, असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या (Mamata Banerjee) की, पाटण्यातून जे सुरू होते, त्याला जनआंदोलनाचे स्वरूप येते म्हणून मीच नितीशजींना पाटणा येथे बैठक घेण्याचा प्रस्ताव दिला होता. तसेच आम्ही सर्व पक्ष एक असून एकत्र लढणार आहोत. आम्हाला विरोधक म्हणू नका, आम्हीही देशाचे नागरिक आहोत. आम्हीही देशप्रेमी आहोत, आम्हीही भारत माता म्हणतो. मणिपूर जळत असल्यामुळे आम्हालाही त्रास होतो. कुणी विरोधात बोलले तर ईडी-सीबीआय मागे लावली जाते. पण कुणी बेरोजगारीबद्दल चिंता करत नाही. आमचे रक्त सांडले तरी चालेल, पण आम्ही लढत राहू असे ममता बॅनर्जी यांनी यावेळी म्हटले.