मुंबई :
पोलीस भरतीत एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी गृहविभागाने ४ जानेवारी रोजी काढलेला वादग्रस्त जीआर रद्द करण्यात आला आहे. याबाबत आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घोषणा केली आहे.
मराठा संघटनांच्या विरोधानंतर राज्य सरकारवर पोलीस भरतीचा वादग्रस्त जीआर मागे घेण्याची नामुष्की ओढवली आहे. मात्र, पोलीस भरतीत SEBC विद्यार्थ्यांना EWSचा लाभ मिळणार आहे. यासंदर्भात गृहविभाग आता नवीन जीआर शुद्धीपत्रक काढणार आहे.
४ जानेवारी रोजी गृह विभागाने काढलेल्या जीआरनुसार एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीत खुल्या प्रवर्गातून भरती व्हावे लागेल, असा उल्लेख होता. त्याविरोधात तक्रार झाल्यानंतर आता गृहविभाने तो निर्णय रद्द केला असून नवा निर्णय जारी केला जाणार आहे. त्यानुसार पोलीस भरतीत एसईबीसी अतंर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना ईडब्लूएस अतंर्गत भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, पोलीस शिपाई भरती २०१९ करीता ज्या एसईबीसी (SEBC) उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यांना शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडील२३ डिसेंबर २०२० च्या शासन निर्णयाचा लाभ देण्याच्या दृष्टीकोनातून सुधारित शासन निर्णय गृह विभागाकडून लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी म्हटले.