
नवी दिल्ली | New Delhi
देशाच्या ७५ वर्षांच्या संसदीय (Parliamentary) प्रवासाचा इतिहास जपणाऱ्या जुन्या संसद इमारतीत आज कामकाजाचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर जुन्या संसद भवनातून (Old Parliament House) आता नव्या संसद भवनात सर्व कारभार स्थलांतरीत केला जाणार आहे. यासाठी जुन्या संसदेतील सेन्ट्रल हॉलमधून आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी भावूक झाल्याचे देखील पाहायला मिळाले. तसेच या संसद भवनात अनेक ऐतिहासिक निर्णय झाले आहेत, असे म्हणत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच पंतप्रधान मोदींनी जुन्या संसदेचं नवं नामकरणंही केले. याला आता 'संविधान सदन' म्हणून ओळखले जावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, "आज आपण या संसदेला निरोप देऊन नव्या संसद भवनात प्रवेश करणार आहोत. गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) दिवशी आपण या नव्या भवनात जात आहोत हे शुभ आहे. पण मी दोन्ही सभागृहातील नेत्यांना विनंती करतो, त्यांच्या समोर एक विचार ठेवतो. मी आशा करतो की आपण दोघांनी मिळून या विचारावर कुठेही मंथन करुन यावर निर्णय घेऊ शकतो. माझी सूचना आहे की, जर आपण नव्या संसद भवनात जात आहोत तर जुन्या संसदेची प्रतिष्ठा कधीही कमी होता कामा नये.
ते पुढे म्हणाले की, या भवनाला केवळ जुनी संसद म्हणून सोडून देऊ, असे होता कामा नये. त्यामुळे माझी प्रार्थना आहे की, जर तुम्ही दोघांनी भविष्यात याला सहमती दिली तर या जुन्या भवनाला 'संविधान सदन' म्हणून ओळखले जावे. कारण हे भवन कायम आपली जीवन प्रेरणा बनेल, तसेच जेव्हा या भवनाला आपण संविधान सदन (Savidhan Sadan) म्हणून संबोधू तेव्हा त्या महापुरुषांचे देखील स्मरण होईल ज्यांनी जे कधी संविधान सभेत इथे बसले होते. त्यामुळे भावी पिढीला हे गिफ्ट देण्याची संधी आपण सोडायला नको," असेही मोदी यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमच्याकडे ७५ वर्षांचा अनुभव आहे. या संसदेतून आम्ही खूप काही शिकलो आहे. तसेच आपल्याकडे मोठा वारसा देखील आहे. अमृतकालच्या २५ वर्षांत भारताला आता एका मोठ्या कॅनव्हासवर काम करावे लागणार आहे. आता छोट्या छोट्या गोष्टीत अडकून पडण्याची वेळ निघून गेली आहे. आत्मनिर्भर भारताचा (India) संकल्प पूर्ण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, पक्षांनी याच्या आड येऊ नये, असेही मोदी यांनी म्हटले.