दिल्ली | Delhi
येत्या रविवारी नव्या संसद भवनाचं उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचा उद्घाटन होणार आहे. मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या या उद्घाटनाला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विरोध केला आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करत हा विरोध केला असून नव्या संसद भवनाचं उद्घाटन कुणाच्या हस्ते झालं पाहिजे हे सुद्धा सूचवलं आहे. राहुल गांधी यांच्या या ट्विटमुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं असून त्यावर भाजपकडून काय उत्तर येतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाचं उदघाटन करू नये, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संसद भवनाचं उदघाटन करण्यात यावं, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.
नव्या संसद भवनाच्या उदघाटनाच्या तारखेवरून आधीच वाद झाला होता. त्यावेळी संसद भवनाच्या उदघाटनासाठी २८ मे हीच तारीख का निश्चित करण्यात आली, यावरून सवाल उपस्थित करण्यात आला होता.
या दिवशी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जन्मतारीख असल्याने ही तारीख निवडण्यात आल्याचा दावा विरोधकांनी केला होता. तसेच २८ तारीख जाणीवपूर्वक निवडण्यात आली कि, तो केवळ एक योगायोग आहे, असा प्रश्नही विरोधकांनी उपस्थित केला होता.
संसदेची ही नवी इमारत चार मजली असून त्याला सहा प्रवेशद्वार आहेत. त्यामध्ये लोकसभेचे एक हजार तर राज्यसभेचे 400 खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था आहे. नव्या संसदेमध्ये प्रत्येक खासदाराच्या समोर एक छोटेखानी टेबल असून त्यावर सर्व आवश्यक त्या अत्याधुनिक सुविधा आहेत. काही दिवसांपूर्वीच स्वत: पंतप्रधानांनी या कामाचा आढावा घेतला होता.