Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यासंत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज पालखी मार्गाबाबत मोदींची मोठी घोषणा

संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज पालखी मार्गाबाबत मोदींची मोठी घोषणा

देहू | Dehu

मी भगवान विठ्ठल आणि वारकऱ्यांना वंदन करतो. देहूच्या (Dehu) पवित्र भूमीवर आज येण्याचे सौभाग्य मला लाभले. हे स्थळ संत तुकाराम महाराजांचे (Sant Tukaram Maharaj) जन्मस्थळ आणि कर्मभूमीदेखील आहे. संत तुकाराम महाराजांचे शिळा मंदिर हे केवळ भक्ती-शक्तीचे केंद्र नव्हे तर सांस्कृतिक भविष्य घडवणारे मंदिर आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले….

- Advertisement -

देहू येथे शिळा मंदिराचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते मंगळवारी पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा तुकोबांची पगडी, उपरणे आणि तुळशीची माळ घालून नितीन महाराज मोरे (Nitin Maharaj More) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्रतिकृती देण्यात आली.

मोदी पुढे म्हणाले की, देहूच्या या परिसरात भगवान पांडुरंग सापडतो. येथील प्रत्येक जण भक्तीने ओतप्रोत संताचे रुप आहे. याच करणामुळे मी देहूच्या सर्व नागरिकांना आदरपूर्वक नमन करतो. मागील काही महिन्यांपूर्वी मला पालखी मार्गावर दोन राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरण करण्याच्या कामाचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य लागले.

ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे निर्माण पाच टप्प्यात तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम तीन टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे. या पूर्ण कामात ३५० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा मार्ग तयार केला जाणार आहे. या कामासठी ११ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे.

भारत देश आपल्या स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. आपण जगातील प्राचीन संस्कृतीपैकी एक आहोत. याचे श्रेय संत परंपरा तसेच ऋषींना जाते. भारत ही संतांची भूमी असल्यामुळे हा देश शास्वत आहे. प्रत्येक युगामध्ये आपल्याकडे देश तसेच समाजाला दिशा देण्यासाठी कोणीतरी महान व्यक्ती आलेला आहे.

आज देश संत कबीरदास यांची जयंती साजरी करत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपानदेव, तसेच मुक्ताबाई या संतांच्या समाधीचे ७२५ वे वर्ष आहे. या महान व्यक्तींनी आपल्या शास्वततेला सुरक्षित केले. भारताला गतीशील ठेवले, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, संत तुकाराम महाराजांच्या अभंगांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. ज्याचा भंग होत नाही. जो वेळेनुसार शास्वत आणि प्रासंगिक असतो तोच अभंग असतो. आज देश सांस्कृतिक मूल्यांवर पुढे जात आहे. यावेळी संत तुकाराम यांचे अभंग आपल्याला उर्जा देत आहेत. आज संत चोखामेळा तसेच त्यांच्या परिवाराने रचलेल्या सार्थ अभंगाथेचे माझ्या हस्ते प्रकाशन करण्याचे मला सौभाग्य लाभले.

या सार्थ अभंग गाथेमध्ये संत परिवाराच्या ५०० पेक्षा जास्त अभंग रचनांना सोप्या भाषेत अर्थासहित सांगण्यात आले आहेत. संत तुकाराम सांगायचे की समाजात उच्च नीचतेचा भेदभाव करणे हे पाप आहे. त्यांचा हा उपदेश भक्तीसाठी जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच हा उपदेश राष्ट्रभक्ती तसेच समाजभक्तीसाठी महत्त्वाचा आहे, असेदेखील ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, मी मागच्या जन्मात काही पुण्याई केली असेल. कारण या मंदिराच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान मोदींसोबत मला उपस्थित राहता आले. ज्ञानेश्वर माऊलींनी पाया रचला पण कळस झाले ते तुकाराम महाराज.

तुकाराम महाराजांनी सश्रद्ध आणि अंधश्रद्धेपासून दूर राहणारा समाज निर्माण केला. त्यांच्या शब्दांमध्ये एवढी ताकद होती की ते कोणी मिटवू शकले नाही. तुकाराम महाराजांच्या शब्दांनी जनतेला व्यापून घेतले, असे फडणवीस म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या