<p><strong>नाशिक । प्रतिनिधी Nashik</strong></p><p>जिल्ह्यातील कालव्यांमध्ये मुबलक पाणीसाठी उपलब्ध आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देवून शेतकर्यांच्या गरजा व मागणी विचारात घेवून पाणी आवर्तनांचे रब्बी व उन्हाळ्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.</p>.<p>जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.11) झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत भुजबळ बोलत होते. यावेळी खा. डॉ. भारती पवार, आ.दिलीप बनकर, आ.डॉ. राहुल आहेर, आ.नितीन पवार, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उर्ध्व मध्यम प्रकल्पाचे मुख्य अभियंता के. बी. कुलकर्णी, अधिक्षक अभियंता व लाभ क्षेत्र विकास प्राधिकारणाच्या प्रशासक अलका अहिरराव, नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांचेसह पाणी वाटप संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.</p><p>भुजबळ म्हणाले, ज्या कालव्यांच्या लाभ क्षेत्रात पाण्याच्या रोटेशनची तत्काळ आवश्यकता आहे, अशा ठिकाणी पहिले रोटेशन द्यायला हरकत नाही. तसेच ज्या ठिकाणी मागणी नाही अशा धरणांच्या लाभ क्षेत्रात पाण्याचे रोटेशन तुर्तास थांबून त्याचा उन्हाळ्यासाठी विचार करण्यात यावा. रब्बी व उन्हाळी हंगामात पाणी मिळेल याबाबत सुक्ष्म नियोजन करावे. त्याचबरोबर लाभ क्षेत्राबाबत खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी व पाणी वाटप संस्था यांच्या पदाधिकार्यांशी व शेतकर्यांशी चर्चा करूनच वेळोवेळी निर्णय घेण्यात यावेत, असे भुजबळ यांनी सांगितले.</p><p>या बैठकीत गंगापूर प्रकल्पातील डावा व उजवा कालवा, उर्ध्व गोदावरी प्रकल्पातील पालखेड, ओझरखेड प्रकल्प, चणकापूर प्रकल्पातंर्गत गिरणा कालवा, कडवा प्रकल्प यामधील उपलब्ध पाणीसाठा व त्याच्या भविष्यातील नियोजनाबाबत संबंधित अधिकार्यांनी माहिती दिली. यावेळी डॉ. भारती पवार, आ. बनकर, डॉ. राहुल आहेर, नितीन पवार, पाणी वाटप संस्थांचे प्रतिनिधी भाऊसाहेब ढिकले, रामदास आवारे, दत्तात्रय संगमनरे यांनी पाणी वाटपाबाबत असलेल्या समस्यांवर पालकमंत्री भुजबळ यांचेसाबत चर्चा करण्यात आली.</p>