जिल्ह्यात अडकलेल्या मजुरांना प्रशासनाकडून संधी

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहर व जिल्ह्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना विशेष रेल्वेने त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यात आले होते. त्यावेळी जे मजूर गावी न जाता येथेच अडकून पडले त्या मजुरांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या वेबसाईटवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. या मजुरांना १२ ऑगस्टपर्यंत आपले नाव नोंदवता येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश येथील मजुरांना विशेष रेल्वेने त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यात आले होते.

करोना संसर्ग प्रतिबंधासाठी शासनाच्या वतीने सार्वजनिक वाहतुकीची साधने तसेच वैयक्तिक वाहनांसाठी परराज्यात जाण्यासाठी परवानगी बंधनकारक केली आहे. सर्वसाधारण आर्थिक स्थिती असलेल्या नागरिकांना परवानगी घेऊन आपल्या खासगी वाहनातून घरी परतता येते. पण आपले वाहन नसलेल्या लोकांची अडचण झाली आहे. त्यामुळे अनेक मजूर या कालावधीमध्ये आपल्या मूळ गावापासून, घरापासून इतर ठिकाणी दूर अडकून पडले आहेत.

अनेक मजूर आजही आहे त्याच ठिकाणी अडकून पडले आहेत. अशा अडकून पडलेल्या मजुरांना आपल्या घरी मूळ गावी परत जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नव्याने एक संधी उपलब्ध करून दिली आहे. १२ ऑगस्टपर्यंत या मजुरांना ऑनलाईन नोंदणी करता येईल. त्यानंतर त्यांना आपल्या मूळ गावी जाणे शक्य होणार आहे. त्यामुळे अशा इच्छुक मजुरांनी ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

या संकेतस्थळावर करा अर्ज

https:migrant.mahabocw.in/migrant/form या संकेतस्थळावर 12 ऑगस्टपर्यंत नियमित रेल्वेसेवा स्थगित असल्याने तोपर्यंत अर्ज करता येईल, असे उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी सांगितले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *