कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे (omicron variant)राज्यात भीतीचे वातावरण आहे. ओमायक्रॉन (omicron variant)वाढू नये यासाठी राज्य सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जातेय. दरम्यान लसीकरण (Vaccination)मोहीम देखील वेगाने सुरू आहे. राज्यात आठ कोटी नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. येत्या पंधरा ते वीस दिवसांत महाराष्ट्र शंभर टक्के लसीकरण होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope)यांनी दिली आहे. कोरोना मृत्यूचे आकडे राज्य सरकारनं कधीही लपवलेले नाहीत असंही टोपेंनी स्पष्ट केलं.
ओमायक्रॉनचा धोका वाढू नये यासाठी राज्य सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. याविषयी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, ओमायक्रॉनविषयी आम्ही आधीपासूनच सांगितले आहे की, आपण या व्हेरिएंटला भीतीदायक म्हणू असे काही नाही. हा व्हेरिएंट खूप जास्त संसर्गजन्य आहे हे नक्की म्हणता येईल. आतापर्यंत 54 जण आढळलेले आहेत. आपण कोरोनाच्या टेस्टिंग देखील जलगतीने करत आहोत. आम्ही या सर्वांवर बारकाईने लक्ष ठेवत आहोत. हायरिस्क कंट्रीजमधून येणाऱ्या विमानांमधील प्रवशांचे आरटीपीसीआर करण्यात येत आहेत. स्क्रीनिंग देखील करण्यात येत आहे आणि त्यामध्ये जर ते पॉझिटिव्ह आढळले तर पुढील जिनोमिंग सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात येत आहेत.