Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामोठी अपडेट! एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्राने उचलले महत्वाचे पाऊल

मोठी अपडेट! एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्राने उचलले महत्वाचे पाऊल

नाशिक | प्रतिनिधी

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एन एम सी) 2019-20 या प्रथम शैक्षणिक वर्षातील एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पाचव्या वेळेस परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॅा.भारती पवार यांनी दिली.

- Advertisement -

यासाठी २०१९-२० या काळातील प्रथम वर्ष एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्यांना भेटून विनंती केली होती, तत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे (एन एम सी) पाठपुरावा व केंद्रीय स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत विस्तृत चर्चा करून या विद्यार्थ्यांना पाचव्या वेळेस परीक्षा देण्याची संधी निर्माण करून दिली आहे.

या विद्यार्थ्यांना आधीच्या नियमांनुसार पहिल्या चार प्रयत्नांमध्ये त्यांची पहिली व्यावसायिक एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते. मात्र, २०१९-२० या काळात कोविड-19 या आजाराच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात आणि देशात लॉकडाऊन असल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालये बंद असल्याने या काळातील एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे अपेक्षित अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नसल्याने त्यांना पाचव्या वेळेस संधी निर्माण करून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालकांच्या शिष्टमंडळाने केली होती.

याअनुषंगाने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगासोबत (एनएमसी) चर्चा करण्यात येवून त्याबाबत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने या विद्यार्थ्यांना पाचव्या वेळेस परीक्षा देण्याची संधी निर्माण करून दिली असल्याने विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळणार आहे. तसेच या निर्णयामुळे महाराष्ट्रातील एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना ही सुवर्ण संधी निर्माण झाली असल्याचे सांगून यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांचे आभार मानले असल्याचेही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कळविले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या