देशाला सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. मोदी सरकार कोरोनाची पहिली लाट सांभळण्यास यशस्वी झाले असले तरी दुसऱ्या लाटेची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले. गुरुवारी भाजपमधूनच सुब्रमण्यम स्वामी यांनी पीएमओला युजलेस म्हणत टीका केली. तसेच कोरोना लढ्याचे नेतृत्व नितीन गडकरी यांच्यांकडे देण्याची मागणी केली. दरम्यान शुक्रवारी नितीन गडकरी यांनी स्वामींच्या या वक्तव्यावर प्रथमच प्रतिक्रिया दिली.
‘मी काही फार महत्त्वाचे काम करत नाही. समाजात माझ्यापेक्षा जास्त चांगले काम करणारे अनेक लोक आहेत. आपले पोलीस कर्मचारी, सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी आणि इतर सर्वच सरकारी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. आपणही सर्वांनी सर्व मतभेद विसरून सामाजिक जबाबदारीतून काम करायला हवं. आम्हीही हाच प्रयत्न करत आहोत,' असे नितीन गडकरी यांनी सांगत प्रत्यक्षात सुब्रमण्यम स्वामी यांच्या वक्तव्यावर बोलण्याचे टाळले.
भाजपचे ज्येष्ठ खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी कोरोनाच्या परिस्थितीवर भाष्य केले. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पंगा घेत कोरोनाविरोधातील लढ्यात पंतप्रधान कार्यालय काही कामाचं नाही, असं सांगत मोदींना घरचा आहेर दिला होता. तसंच या लढ्याचं नेतृत्व नितीन गडकरी यांच्याकडे देण्यात यावं, अशी मागणी थेट सोशल मीडियातून केली. भाजपच्या एका नेत्याने जाहीरपणे पंतप्रधान कार्यालयावर टीका केल्याने पक्षात चांगलीच खळबळ उडाली होती.