कोल्हापूर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील आमदारांचा गट भाजपसोबतच्या सत्तेत सहभागी झाल्याने पक्षातील आणखी संभाव्य फूट टाळण्यासाठी आणि पक्ष बांधणीसाठी रस्त्यावर उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज, शुक्रवारी कोल्हापूरमध्ये सभा झाली. या सभेसाठी शरद पवार गटाकडून जोरदार तयारी केली होती. यापूर्वी शरद पवार यांनी नाशिक आणि बीडमध्ये सभा घेऊन अजित पवार गटाचा समाचार घेतला होता.
सभेत बोलतांना शरद पवार म्हणाले की, माझी आई कोल्हापूरची होती. मला जन्म दिलेली माता कोल्हापुरची होती. कोल्हापुरच्या आईच्या पोटी जन्म घ्यायचं भाग्य मला मिळालं. आजची बैठक, सभेत एका गोष्टीचा आनंद आहे.
काल एक अतिशय मोठी गोष्ट केलं. सगळं जग बघत होतं. ‘चांद्रयान ३’ हे चंद्रावर उतरलं. एक ऐतिहासिक काम या देशाच्या तज्ज्ञांनी केलं. इस्त्रोच्या संघटनेने हे काम केलं. या इस्त्रोच्या संघटनेला स्थापन करण्याची भूमिका जवाहरलाल नेहरु यांनी घेतली होती. सर्वपक्षीय पंतप्रधनांच्या प्रयत्नांनी इस्त्रोला यश मिळालं आहे. डॉ. विक्रम साराभाई, सतीश धवन या सगळ्या जाणकारांनी योगदान दिलं. काही दिवसांनी आपल्याला कळेल की, चंद्रात पाणी किती आहे, सोनं-चांदी आहे का, या सगळ्या गोष्टींची माहिती चंद्रयानातून माहिती मिळेल.
लोक महागाईने त्रस्त आहेत, लोक बेरोजगारीने त्रस्त आहेत. आम्ही कष्ट करायला तयार आहोत. आम्ही घाम गाळायला तयार आहोत. आमच्या घामाला किंमत द्या. घाम गाळायची संधी द्या. बेकारीतून आमची सुटका करा, एवढी एकच मागणी या देशाचे तरुण आणि शेतकरी करत आहेत. दोन दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात 18 दिवसांमध्ये 24 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं. जीव देणं ही साधी गोष्ट नाही. कुटुंबाची जबाबदारी सोडून प्राण सोडायला ज्यावेळी शेतकरी तयार होतो याचा अर्थ या राज्याचा शेतकरी संकटात आहे.
शेतमालाला किंमत देत नाही. शेतमालाला किंमत देतादेता त्याच्या डोक्यावर कर्जाचं ओझं होतं. ते कर्ज फेडण्याची त्याची इच्छा आहे. कर्ज फेडलं नाही तर त्याच्या अब्रूचे धिंडवडे काढले जातात. त्यामुळे शेतकरी टोकाचा निर्णय घेतो.
केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के कर लावला, या विरोधात शेतकऱ्यांनी मोठा संघर्ष केला. मी कृषी मंत्री असताना, कांद्यावर कर लावला नाही, असं शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले. सत्तेचा उपयोग विरोधकांवर कारवाई साठी केला जात असल्याचाही उल्लेख त्यांनी केला परंतु सत्य ते सत्य असते, लोकशाही वर विश्वास असून आम्ही कारवाईस घाबरणार नाही असेही त्यांनी सांगितले