मुंबई :
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. आता लग्नासाठी केवळ ५० लोकांच्या उपस्थितीच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सर्व शंभर टक्के लोकांची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले आहे. ही चाचणी केली नसेल तर एका व्यक्तीमागे एक हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांत शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. लग्न समारंभ व इतर कार्यक्रमानिमित्त होणारी गर्दी आणि मास्क न वापरणे, सुरक्षित सामाजिक अंतर न राखणे यामुळेच ही परिस्थिती ओढावली आहे. यामुळेच राज्य शासनाने रविवारी काढलेल्या आदेशात लग्न समारंभावर अधिक कडक निर्बंध घातले आहे. या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सध्या पुणे जिल्ह्यासाठी हा नियम आहे.
काय आहेत आदेश
जिल्हाधिकारी यांच्या आदेशामध्ये कार्यालय मालकाकडून नियम व अटीचे पालन करणार असल्याचे हमीपत्र घ्यावे. पन्नास व्यक्तीची उपस्थिती ही संख्या आचारी, मदतनीस, वाढपे, वाजंत्री, भटजी, फोटोग्राफर व्हिडीओ चालक, सुत्रासचालक यांच्यासह गृहीत धरावी,
मंगल कार्यालय व्यवस्थापक / मालक यांनी लग्न समारंभाचे प्रवेशव्दारावर ऑक्सीमीटर, इन्फ्रा थर्मामीटर (थर्मल स्कॅनिंग गन) चा वापर करावा. प्रवेशव्दाराजवळ उपस्थितांचे नाव, मोबाईल क्रमांक व स्वाक्षरी घ्याव्यात. ऐवढेच नाही तर विवाह समारंभ व अन्य कार्यक्रम झाल्यानंतर चित्रीकरणाची सीडी पाच दिवसांत पोलीस ठाण्यात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणा-यावर थेट गुन्हे दाखल करा व मंगल कार्यालयांचे लायसन्स रद्द करण्यात येणार आहे.