
मुंबई | Mumbai
विधान परिषदेच्या (Legislative Council) पाच जागांसाठी झालेल्या मतदानाचे (Voting) निकाल आज जाहीर होत असून आतापर्यंत दोन जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यामध्ये कोकण शिक्षक मतदारसंघात (Konkan Teacher Constituency) भाजपने (BJP) तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) बाजी मारली आहे. तसेच अमरावती, औरंगाबाद आणि नाशिकची मतमोजणी अद्याप सुरु आहे.
विधान परिषदेच्या या निवडणुकांमध्ये नाशिक पदवीधरची निवडणूक (Nashik Graduate Election) शेवटच्या क्षणी घडलेल्या राजकीय घटनांमुळे राज्यात चर्चेची ठरली होती. त्यानंतर आता निवडणूक निकालाच्या वेळी याठिकाणी उभे असलेले अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात अटीतटीची लढत होत असल्याचे दिसत आहे.
सत्यजित ताबेंनी (Satyajeet Tambe) पहिल्या फेरीअंती आठ हजार तर दुसऱ्या फेरीअंती साडे चौदा हजार मतांची आघाडी घेतली आहे. तर माविआ पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) पिछाडीवर आहेत. यानंतर आता नाशिक पदवीधरच्या निवडणुकीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पहिल्यांदाच भाष्य करत मोठे विधान केले आहे.
पवार म्हणाले की, सत्यजित तांबे हे काँग्रेस पक्षाचे युवकांचे अध्यक्ष होते. ते पक्षाचे जवळचे कार्यकर्ते होते. त्यांना उमेदवारी दिली असती तर असे घडले नसते त्यामुळे नाशिकमधून सत्यजित तांबेच निवडून येणार असल्याचे म्हणत त्यांनी काँग्रेसला कानपिचक्या दिल्या आहेत.
पुढे ते म्हणाले की, सत्यजित तांबे निवडून आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतील. तांबे यांच्या रक्तारक्तात काँग्रेस (Congress) आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार नसल्याचा विश्वास देखील यावेळी अजित पवारांनी व्यक्त केला. त्याबरोबरच आजच्या विजयाने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हूरळून जावू नये अजून मोठी लढाई बाकी असल्याचे देखील त्यांनी म्हटले.