
पुणे | Pune
काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशात झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करत राष्ट्रवादी पक्षावर (NCP) भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला होता. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीसोबत झालेला पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांचा डाव होता? असे म्हणत पवारांवर आरोप केला होता.
यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी त्यांच्यावर झालेल्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी आज गुरुवारी (२९ जून) पुण्यात पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर सविस्तर भाष्य केले...
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या (Corruption) आरोपांबाबत बोलताना पवार म्हणाले की, भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. मी कोणत्याही बँकेचा सभासद नसताना माझ्यावर आरोप करण्यात आले. ज्यांच्यावर आरोप करण्यात आले त्यामध्ये भाजपचेही काही नेते होते. त्यामुळे अशी वक्तव्य मोदींच्या पदाला शोभणारे नसल्याचे पवारांनी म्हटले.
तसेच देशातील अनेक राज्य भाजप (BJP) सांभाळू शकली नाही. सध्या देशातल्या बहुतांश राज्यात भाजपची सत्ता नाही. अनेक राज्य भाजपच्या हातातून गेले पण आमदार (MLA)फोडून भाजपने त्या ठिकाणी राज्य आणले. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात काय झाले हे सांगण्याची गरज नाही. जिथे भाजपची सत्ता आहे, तिथेच दंगली होत आहेत. असेही शरद पवार म्हणाले.
तर देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर बोलतांना शरद पवार म्हणाले की, सरकार स्थापन करण्यासाठी भाजप आणि आमची चर्चा झाली होती. सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादीने बाहेरुन पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. पण मी जर निर्णय बदलला होता, तर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ का घेतली ? माझा पाठिंबा होता तर दोन दिवसात सरकार का पडले ? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. तसेच विकेट गेलेला माणूस विकेट गेली म्हणून सांगतो का ? असा टोलाही पवारांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.
पुढे ते म्हणाले की, राज्य सरकारला एक वर्ष झाले, अनेक प्रश्न समोर आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा कायदा आणि सुव्यवस्थेचा आहे. महिला आणि मुलींवर हल्ले या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पुणे, ठाणे, मुंबई आणि सोलापूर या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये मुली आणि महिलांवर हल्ले वाढले आहेत. २३ जानेवारी ते २३ मे या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर मुली बेपत्ता झालेल्या आहेत. पुण्यातून ९२३ मुली बेपत्ता आहेत. ठाण्यातून ७२१ बेपत्ता, मुंबई ७३८, सोलापूरमधून, अशा मिळून २४५८ मुली बेपत्ता झालेल्या आहेत. १४ जिल्ह्यात ४ हजार ४३१ मुली बेपत्ता झालेल्या आहेत, असे पवारांनी सांगितले.