Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकच्या रथयात्रेला सव्वादोनशे वर्षांची परंपरा

नाशिकच्या रथयात्रेला सव्वादोनशे वर्षांची परंपरा

नाशिक । अनिरुद्ध जोशी Nashik

पौराणिक आणि ऐतिहासिक काळापासून प्रमुख धार्मिक क्षेत्र म्हणून नाशिकची ओळख आहे. श्रीरामनवमीनिमित्त ( Shri Ramnavmi)काढण्यात येणारी रथयात्रा ही प्रत्येक नाशिककरासाठी औत्सुक्याचा विषय आहे. तब्बल सव्वादोनशे वर्षांची नाशिकच्या रथयात्रेची परंपरा आजही अविरतपणे सुरु आहे. कामदा एकादशीला रामरथ आणि गरुड रथाची मिरवणूक काढण्यात येते. या रथयात्रेचा इतिहासही तितकाच रोमहर्षक आहे.

- Advertisement -

सवाई माधवराव पेशवे आजारी असतांना त्यांना उत्तम आरोग्य लाभावे. यासाठी श्रीमंत गोपिकाबाई पेशवे यांनी प्रभू श्रीरामाला नवस केला होता. त्यांना बरे वाटल्यानंतर पेशवे यांनी प्रभू रामाला रामरथ अर्पण केला होता. पेशवे यांनी त्यांचे मामा सरदार रास्ते यांच्याकडे रामरथाच्या देखभालीची जबाबदारी सोपविली. रास्ते यांनी रास्ते आखाडा तालीम संघाची स्थापना करून अनेक पहिलवान घडविले होते. हे पहिलवान रथोत्सवात रथ ओढत असे. तेव्हापासून तर आतापर्यंत श्रीराम रथ ओढण्याची जबाबदारी सरदार रास्ते आखाडा तालीम संघाकडे आहे. पूर्वीच्या काळी रस्ते नव्हते. त्यामुळे खडतर मार्गानेच रथ ओढला जात होता.

एकदा रथोत्सवात रथ वाघाडी नाल्यातील चिखलात फसला असता पाथरवट समाजातील काही कार्यकर्त्यांनी रथ सुखरूप बाहेर काढला. तेव्हापासून रामाच्या रथाची धुरा वाहण्याचा मान पाथरवट समाजाकडे देण्यात आला आहे. श्रीराम रथाचे मानकरी हे सरदार रास्ते आखाडा तालीम संघाचे पदाधिकारी आहेत तर गरुड रथाचा मान अहिल्याराम व्यायामशाळेकडे आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

गरुड रथ आणि रामरथाचे मानकरी एकादशीला काळाराम मंदिरात आल्यानंतर त्यांचा फेटे बांधून सन्मान केला जातो. त्यानंतर साग्रसंगीत पूजा, आरती आणि मंदिर प्रदक्षिणा झाल्यावर पालखीतून प्रभू श्रीरामाच्या पादुका आणि उत्सवमूर्ती पालखीतून पूर्व दरवाजाच्या बाहेर आणली जाते. रथोत्सवाच्या दिवशी रथाचे मानकरी असलेले बुवा हे दोन्ही रथांकडे तोंड करून उलट्या दिशेने रथोत्सव मार्गावर मार्गक्रमण करतात. गरुड रथात प्रभू श्रीरामांच्या पादुका, तर राम रथामध्ये प्रभू श्रीरामाची भोगमूर्ती ठेवलेली असते. मिरवणुकीत सर्वप्रथम मानकरी बुवा, त्यानंतर पालखी, ढोल-झांजपथक त्यानंतर गरुड रथ आणि मग राम रथ असा क्रम असतो.

काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून ‘जयसीता रामसीता’चा गजर करीत या मिरवणुकीला प्रारंभ होतो. उतार असलेल्या ठिकाणी रथांवर नियंत्रण राखण्यासाठी उटीची व्यवस्था असते. राम रथाची मिरवणूक म्हसोबा पटांगणावर आल्यावर तिथे राम रथ थांबतो. प्रभू श्रीराम व्रतस्थ असल्याने ते नदी ओलांडत नाहीत, अशी प्रथा असून, गरुड रथ शहराच्या अन्य भागातून फिरतो. कापड पेठेतील बालाजी मंदिराच्या इथे आरती होते.

ही आरती होण्याचे कारण बालाजीवाले यांचे पूर्वज सत्पुरुष मानले जाणारे श्री तीमैय्या महाराज यांच्या हस्ते प्रभू श्री रामचंद्राची मंदिरात स्थापना झाली आहे. त्यामुळे बालाजी मंदिरात तीमैय्या महाराज यांचा मान म्हणून आरती होते. त्यानंतर गाडगे महाराज पुलाखालील म्हसोबा पटांगणावर रथ येतो व गरुड रथाचा दांडा रामरथाला लावला जातो. म्हणजेच पूजा रामरथाला अर्पण होते. ही परंपरा वर्षानुवर्षे आजही सुरु आहे. तिथून रामकुंडाकडे ही मिरवणूक मार्गस्थ होते. रामकुंडावर प्रभू श्रीरामाच्या मूर्तीला अवघृत स्नान घातले जाते. त्यानंतर ही मिरवणूक पहाटेपर्यंत काळाराम मंदिरात येते आणि रथोत्सवाचा समारोप होतो, अशी माहिती विश्वस्थ धनंजय पुजारी यांनी दिली आहे.

शेकडो वर्षांपासून रथोत्सवाची परंपरा आजही कायम आहे. यंदाचा मान समीरबुवा पुजारी यांचा असून, रथोत्सवासाठी संपूर्ण नाशिककरांसह प्रशासन सज्ज झाले आहे.

धनंजय पुजारी, विश्वस्थ, काळाराम संस्थान.

- Advertisment -

ताज्या बातम्या