Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याअतिवृष्टीमुळे नुकसान; राज्यशासन शेतकऱ्यांना मदत करणार

अतिवृष्टीमुळे नुकसान; राज्यशासन शेतकऱ्यांना मदत करणार

नाशिक | Nashik

गेल्या दोन दिवसात नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासाठी राज्यशासन शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करणार असून शेतकऱ्यांना अधिकची मदत मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडे राज्यशासनसमार्फत प्रस्ताव पाठविला जाईल, असा दिलासा आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे…

- Advertisement -

इगतपुरी तालुक्यातील खंबाळे येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या भात पिकाच्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्याच्या वेळी पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी एस. पी. सूर्यवंशी, तहसीलदार परमेश्वर कासुळे, तालुका कृषी अधिकारी एस. आर. तवर, मंडल अधिकारी आर.आर. पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना पालकमंत्री भुजबळ म्हणाले, नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याअनुषंगाने झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाने पंचनाम्याचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्यात करावा, जेणे करून मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेऊन लवकरच मदत जाहीर केली जाईल, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले आहे.

पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले की, गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाच्या काळात सर्वत्र लॉकडाऊन असल्याने राज्यसह संपूर्ण देश आर्थिक संकटात आहे.

अशाही परिस्थितीत महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून साधारण 20 हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. आता उद्धभवलेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व मदत राज्य शासन करण्यास प्रयत्नशील आहे.

संपुर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्याची शासनामार्फत पाहणी करण्यात येत आहे. यापाहणी अंतर्गत कोणत्या पिकांचे व किती हेक्टरमध्ये नुकसान झाले आहे, याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू असून राज्याचे मुख्यमंत्री देखील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत आहेत.

आणि संबंधित विभागांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या