मनमाड | प्रतिनिधी Manmad
सध्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत (Manmad APMC) सर्वच भाजीपाल्याच्या भावात मोठी घसरण झाली असून पिकावर केलेला खर्च तर सोडाच वाहतुकीचा खर्च देखील निघत नाही त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. कष्टाने पिकविलेला शेतमाल कवडीमोल भाव मिळत असल्याने टोमॅटो, कारले (Carly), वांगे (Brinjal) रस्त्यावर फेकून देण्याची वेळ बळीराजावर आली आहे….
टोमॅटो (Tomato) पाठोपाठ आता वांग्याच्या भावात मोठी घसरण झाली असून वांग्याला प्रति किलो 2 ते 3 रुपये इतकाच भाव मिळत आहे. एक किलो वांगे पिकविण्यासाठी 8 ते 10 रुपये खर्च येतो, मात्र सध्या जो भाव मिळत आहे.
त्यातून वाहतुकीचा खर्च देखील निघत नसल्याचे पाहून हवालदिल झालेल्या देवळा तालुक्यातील विठेवाडी (Vithewadi Deola Taluka) येथील राजेंद्र देवरे या शेतकऱ्याने अक्षरशः एक ट्रॅक्टर वांगे शेताच्या बाजूला फेकून आपला संताप व्यक्त केला.
मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या आणि किरकोळ बाजारात टोमॅटो, वांगे, कोबी, मिर्ची, फ्लॉवर, कारले यासह सर्वच भाजीपाल्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे.
एकीकडे शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी संकटात सापडला तर दुसरीकडे मात्र भाजीपाला स्वस्त मिळत असल्यामुळे महागाईने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मनमाड बाजार समितीतून मध्य प्रदेश, गुजरात यासह इतर राज्यात भाजीपाला पाठविला जातो. टोमॅटोची सर्वात जास्त निर्यात बांगलादेश मध्ये केली जाते मात्र सर्वच ठिकाणी मागणी कमी झाली आहे. आवक जास्त तर मागणी कमी अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याने भाव कोसळल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
भाजीपाला भाव प्रति किलो
टोमॅटो-1 ते दीड रुपये
वांगे-2 ते 3 रुपये किलो
कारले-3 ते 4 रुपये किलो
कोबी-1 ते 2 रुपये कंद
बटाटे -8 ते 10 रुपये किलो
वाल घेवडा-10 रुपये किलो
मिरची-2 ते 3 रुपये किलो
मेथी-4 ते 5 रुपये जुडी
कोथिंबीर-2 ते 3 जुडी