नाशिक | प्रतिनिधी Nashik
नाशिक महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. भाजपची महापालिकेवर सत्ता आहे. हीच सत्ता भाजप कायम ठेवणार यात शंका नाही. करोनाकाळात नाशिकवर काय अन्याय केलाय हे जास्त सांगायला नको. आता भगव्याची जबाबदारी भाजपची आहे. भगवा छत्रपतींचा आहे, काहीजण भगवा नुसता मिरवत आहेत. इतर कोणाबरोबर जात आहेत अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला हाणला....
राज्यात तीन पक्षांचे असलेले सरकार काय करत आहेत तुम्हाला माहितीच आहे. मुंबई काय दिवे यांनी लावले आहेत, हे आम्ही रोजच बोलतो आहोत. पण हे तिन्ही पक्ष एकमेकांशी मैत्री करतील, वेगळे लढतील ते उद्या काहीही बोलतील यांच्या पाठीमागे न लागता भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. विकासाला मत देण्यातही भाजपशिवाय पर्याय नसल्याचे फडणवीस याप्रसंगी म्हणाले.
ते म्हणाले, भगव्याचे रक्षण करण्याची जबाबदारी भाजपने घेतली आहे. भगवा कायम आता डौलात फडकत राहणार आहे. मी बोललो होतो नाशिकला आम्ही दत्तक घेऊ. काहींनी गैरसमज केला की दत्तक घेणार म्हणजे दलाली खाणार असा घेतला. आम्ही मात्र, सरकारी योजना तळागाळात पोहोचविण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे. अनेक योजना आपण आणल्या.
नाशिकची वाहतूक व्यवस्था सुधारण्याची जबाबदारी भाजपने घेतली. नियो मेट्रोचे नाशिक मॉडेल तयार झाले. केंद्राने याबाबतची दखल घेतली. केंद्र सरकारची मंजुरी दिल्यानंतर अवघ्या तीन वर्षांत नाशकात मेट्रो धावू लागेल.
महामेट्रोला आता उत्तर प्रदेशातील कामे मिळाली आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर या मेट्रोची स्थापना केली होती. आज अनेक यशोशिखरे ही कंपनी गाठत आहे. प्रदूषण मुक्त नाशिककडे यापुढची वाटचाल असेल. नमामि गोदा प्रकल्पाला केंद्र मंजुरी देणार आहेत. नाशिकमधील वाहतूक व्यवस्था इलेक्ट्रिक आणि सीएनजीवर चालविण्यात येणार आहे.