नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक जिल्ह्यातील 196 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल (Grampanchayat Election Result) आज लागला. ठाकरे गटाने शिंदे गटापेक्षा अधिक जागा पदरात पाडून वरचष्मा कायम ठेवला आहे. मात्र सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेसने पटकावल्या आहेत...
जिल्ह्यात 196 ग्राम पंंचयतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यातील आठ बिनविरोध झाल्याने 188 ठिकणी मतदान झाले. आज सर्वत्र निकाल जाहीर झाले. छत्रपती संभाजी राजे यांच्या स्वराज्य संघटनेने जिल्ह्यात प्रवेश केला. तीन जागांवर संघटनेचा भगवा फडकला.
जिल्ह्यातील सात तालुक्यातील ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे घड्याळ खूपच चालले. त्यापाठोपाठ भाजपच्या कमळाने आघाडी घेतली. नंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे व बाळासाहेबांची शिवेसना आणि काँग्रेस असल्याचे चित्र सर्वत्र दिसले. अर्थात शिंदे गट भाजपाशी मिळता जुळता असल्याने सत्ताधारी गटाने बाजी मारल्याचे सांगितले जात आहे.
नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांंच्या येवला मतदारसंघात ठाकरे गटाने वर्चस्व प्रस्थापित केले. सात पैकी फक्त एका ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा विजय झाला. शिंदे गटाचे आमदार, खासदार पालकमंत्री असतांनाही नांदगाव, मालेगाव व्यतिरिक्त पक्षाची फारशी ताकद दिसली नाही.
देवळा, चांदवड मध्ये भाजप तर बागलाण कळवणमध्ये राष्ट्रवादी कांँग्रेसने आपली ताकद दाखवली. आ. सुहास कांदे यांनी नांदगाव मतदारसंघात 15 पैकी 13 जागावर शिंदे गटाचा भगवा फडकविला.
आमदार राहुल आहेर यांच्या चांदवड तालुक्यात भाजपला 14 जागा मिळल्या. देवळा तालुक्यात भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी आपला गड राखला. 13 पैकी 11 जागी भाजप आले. दादा भुसे यांच्या मालेगावमध्ये शिंदे गटाला 6 तर भाजपला 4 जागा मिळाल्या आहेत.
कुणाला किती जागा?
63 जागा पटकावून राष्ट्रवादी जिल्ह्यात नंबर एक,
भाजप 55 जागा घेऊन दुसर्या स्थानी,
शिवसेना (ठाकरे गट) 28 जागा,
शिवसेना (शिंदे गट) 22 जागा,
काँंग्रेस - 8 जागा,
स्वराज्य संघटना - 3 जागा,
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी १ जागा,
इतर अपक्ष व पक्ष मिळून 17 जागांवर विजय.