नाशिक । प्रतिनिधी
नाशिक विभागात १ ते १६ जानेवारीदरम्यान झालेल्या वादळी वार्यासह अवकाळी पावसामुळे विभागात सहा हजार ५१६ हेक्टरवरील पिकांचे व फळपिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्यात नाशिक जिल्ह्यात द्राक्ष पिकाचे सर्वाधीक नुकसान झाले आहे.विभागीय कृषी सहसंचालकांच्या अहवालानुसार विभागातील १९ तालुक्यांत पिके बाधित झाली आहेत.,..
गत वर्षी आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात राज्यासह जिल्ह्यात धुमाकूळ घालणार्या पावसाने नाशिक जिल्ह्यातील ३ लाख ६६ हजार ८३० शेतकर्यांचे
पिकांचे नूकसान केले होते. या नुकसान ग्रस्तांना नव्या वर्षाच्या प्रारंभीच शासन मदतीचे वाटप सुरु असतांनाच पुन्हा शेतकर्यांना अवकाळी पावसाने झोडपले.
१ ते १६ जानेवारीदरम्यान झालेल्या या वादळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यात तीन हजार ५४६.२० हेक्टरवर नुकसान झाले असून , दिंडोरी , त्र्यंबकेश्वर , पेठ , निफाड , येवला या तालुक्यांमध्ये गहू , कांदा , ऊस, आंबा , द्राक्षे व भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे . नंदुरबार जिल्ह्यात ४०५.७९ हेक्टरवर नुकसान झाले असून , नंदुरबार , शहादा, तळोदा,अक्कलकुवा या तालुक्यांमध्ये गहू ,मका,हरभरा,ज्वारीचे नुकसान झाले.तर धुळे जिल्ह्यात ५९६ हेक्टरवर बाधित क्षेत्र असून,धुळे व शिंदखेडा तालुक्यामध्ये ज्वारी,मका व गहू यांचे नुकसान झाले आहे.
जळगाव जिल्ह्यात एक हजार ५५८ हेक्टरवर नुकसान झाले असून,जळगावमध्ये चाळीसगाव,अमळनेर , पारोळा व
भडगाव या तालुक्यांमध्ये ज्वारी , गहू , मका व कापूस या पिकांचे नुकसान झाले.तर नगर जिल्ह्यामध्ये ४०९.४६ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले असून,कोपरगाव,श्रीरामपूर व अकोले या तीन तालुक्यात द्राक्ष व ज्वारीचे नुकसान झाले आहे.