मुंबई | प्रतिनिधी Mumbai
मुंबईत पार पडलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत अनुचित प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. या परिक्षेत मोठ्या प्रमाणात हायटेक कॉपी करण्यात आली. कमी गुण असलेल्या उमेदवारांना पात्र ठरवण्यात आले, यासह भरतीसाठी उमेदवारांकडून १५ लाख रुपये घेण्यात आल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. या प्रकरणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालून पोलीस भरती प्रक्रिया स्थगित करावी तसेच नव्याने पारदर्शक पद्धतीने फेरपरिक्षा घ्यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी केली.
पोलीस भरती प्रक्रियेतील घोटाळ्यासंदर्भात राज्यातील विविध भागातून आलेल्या उमेदवारांनी आज पटोले यांची टिळक भवन येथे भेट घेऊन परिक्षेत झालेल्या घोटाळ्याची माहिती दिली. यानंतर पटोले यांनी पोलीस महासंचालकांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून सर्व प्रकार त्यांना सांगितला आणि कारवाई करण्याची मागणी केली. याशिवाय त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र पाठवले आहे.
पोलीस भरती प्रक्रियेत जास्त गुण असलेल्यांना वगळून कमी गुण मिळालेल्या मुलांना भऱती करून घेण्यात आले आहे. शारीरिक चाचणीमध्ये पैसे घेऊन गुण वाढवण्यात आले. शारीरिक चाचणीत पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना लेखी परिक्षेपासून वंचित ठेवण्यात आले. पोलीस दलात भरती होण्यासाठी काही उमेदवारांकडून १५ लाख रुपये घेण्यात आले असून या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला. पात्र विद्यार्थ्यांना वंचित ठेवून भ्रष्ट मार्गाचा अवलंब केलेल्यांना पोलीस दलात भरती करण्यात आल्याच्या तक्रारी या भरती प्रक्रियेतील उमेदवारांनी आमच्याकडे केल्याचे पटोले यांनी पत्रात म्हटले आहे.
पोलीस दलात अशा प्रकारे भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून भरती केल्याच्या तक्रारी गंभीर आहेत. या पोलीस भरती प्रक्रियेची स्वतंत्र यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी. उमेदवारांच्या तक्रारी पाहता पोलीस भरती प्रक्रियाच संशयास्पद वाटत असल्याने मुंबईत पार पडलेली पोलीस भरतीची प्रक्रिया स्थगित करुन ती पुन्हा पारदर्शक पद्धतीने घ्यावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.