
मुंबई | Mumbai
महाविकास आघाडीमध्ये सध्या लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्याची चर्चा सुरु झाली आहे. तिन्ही पक्षांनी अर्थात ठाकरे गट, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस यांनी आपापल्या ताकदीची चाचपणी सुरु केली असून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ठाकरे गटाचे 19 खासदार लोकसभेत दिसतील, असा दावा केला. त्यामुले राज्यात ठाकरे गटाने जिंकलेल्या सर्व 18 जागांवर ते लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राऊतांना इशारा दिला आहे.
जागा वाटपाबाबत अजुनही चर्चा नाही.त्यामुळे जागांबाबत कोणीही वक्तव्यं करू नये.भाजपला पराभूत करणे आमचा मुळ उद्देश आहे. संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, आमचा त्यांना सल्ला आहे, असे नाना पटोले यांनी राऊतांच्या विधानावर म्हटले. तसेच अद्याप असा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही, अशी चर्चा देखील झालेली नाही. आमच्या तिन्ही पक्षांकडून ३-३ लोक देऊन ९ लोकांची समिती केली जाईल आणि अंतिम निर्णय घेतला जाईल, असे पटोले यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, "जागा वाटपाचा प्रश्न लवकरच सोडवला जाईल. २१ तारखेला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे. यामध्ये आम्ही आमच्या तीन नेत्यांना पाठवणार आहोत. सर्व जागांच वाटप हे मेरिटवर केलं जाईल. तसेच कमिटीमध्ये यावर चर्चा होईल" अशा माहिती नाना पटोले यांनी दिली.
दरम्यान, प्रत्येक पक्षाने आपापली तयारी सुरू केली असेल तर यात काहीही वावगे नाही, असे पटोले यांनी शरद पवार यांच्या प्रश्नावर म्हटले. कॉंग्रेस देखील आपले काम करत असून आमची चाचपणी सुरू असल्याचे पटोले यांनी अधिक सांगितले.
तसेच, जागा वाटपाबाबच फॉर्म्युला अजून ठरलेला नाही. मात्र, २०१९ मध्ये जिंकलेल्या जागा आम्हीच लढणार, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यावर निवडून कोण येईल? हा जागा वाटपाचा निकष राहिल असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.