
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
महाराष्ट्रातील (Maharashtra) मोठे व्यवसाय पळवून ते गुजरातला (Gujarat) नेण्याचे ‘उद्योग’ मागील दीड वर्षांपासून सातत्याने सुरु आहेत. वेदांता-फॉक्सकॉनसह अनेक उद्योग गुजरातला देऊन शिंदे-फडणवीस-पवार हे महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जात आहेत. मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यात विद्यमान भाजप सरकार कसलीही कमतरता भासू देत नाही. आता मुंबईतील मोठ्या हिरे उद्योगासह इतर उर्वरित उद्योगही सुरतला घेऊन जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज गुरुवार (दि.२६) रोजी केला...
मुंबईतील (Mumbai) जवळपास १७ हजार कोटींचा हिरे व्यापार सूरतला हलवला जात आहे. हिरे व्यापार सुरतला गेल्यास राज्याच्या महसुलावर त्याचा परिणाम होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीका केली. मागील दीड वर्षात राज्यातील भाजप (BJP) सरकार दिल्लीच्या आदेशानुसार महाराष्ट्राची लूट करत आहे. सुरतमध्ये मोठा हिरे उद्योग उभा केला जात आहे, त्यासाठी मुंबईतील हिरे उद्योगही सुरतला नेण्यासाठी तसेच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे कामही मार्गी लागावे यासाठी पंतप्रधान मोदी आले आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्प हा महाराष्ट्रावर मोठे ओझे आहे. पण मोदी-शहा यांच्यासमोर समोर शिंदे-फडणवीस-पवार काहीच बोलू शकत नाहीत. मुंबई आणि महाराष्ट्रातील उद्योग, महत्वाची कार्यालये, संस्था महाराष्ट्राबाहेर घेऊन जाण्याचा सपाटा भाजपने लावलेला आहे. राज्याला रसातळाला घालवण्याचे पाप भाजप सरकार करत आहे, अशी टीका पटोले यांनी केली.
मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रश्नावर एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन समाजाची फसवणूक करत आहेत. तर दुसरीकडे सदावर्ते नावाचा वकील मराठा समाजाला आरक्षण मिळू देणार नाही, त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार अशी जाहीर दर्पोक्ती करत आहे. या सदावर्तेचा बोलविता धनी कोण आहे हे सर्वांना माहित आहे. याआधीही सदावर्तेनी विविध मुद्द्यांवर भाजपधार्जिणी भूमिका घेतली आहे. सदावर्ते हा फडणवीस यांनी दिलेली भूमिका मांडत असतो. यावरून मराठा आरक्षणाला कोणाचा विरोध आहे आणि मराठा विरुद्ध ओबीसी (Maratha vs OBC) वाद कोण उभा करत आहे हे स्पष्ट होते, असे पटोले म्हणाले.
ओबीसी जनजागरण यात्रा
दरम्यान, भाजपच्या पाठोपाठ काँग्रेसने राज्यात ओबीसी जनजागरण यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मांडलेली जातनिहाय जनगणनेची भूमिका राज्यातील जनतेसमोर मांडण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाच्या वतीने येत्या ३ जानेवारीपासून राज्यात ही यात्रा निघेल. ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काढली जाणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डोळयासमोर ठेवून काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.