राज्यात चर्चेत असलेले ड्रग्ज प्रकरण जळगाव (jalgaon)जिल्ह्यात पोहचल्याची बातमी सकाळी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने दिली. त्यानंतर राज्यातील माध्यमांचे लक्ष जळगावकडे पोहचले.
स्थानिक पत्रकारांपासून पोलिसांपर्यंत सर्वांचे फोन खणखणू लागले. परंतु जळगाव जिल्ह्यात अशी कारवाईच झाली नसल्याचा दावा स्थानिक मंडळी व पोलिसांकडून होऊ लागला. परंतु एनसीबीचे (ncb) पथक थेट जळगाव जिल्ह्यात एरंडोलमध्ये आल्याचे वृत्त एएनआयने (ANI)दिल्याने त्याची सत्यता सर्वांना वाटत होती. त्याच आधारे सर्वच वेबसाइट व सोशल मीडियात ही बातमी गेली.
एरंडोलजवळ गांजाचा ट्रक पकडल्याचे ट्वीट ‘एएनआय’दिले. परंतु हा गांजाने भरलेला ट्रक एरंडोलजवळ नव्हे तर नांदेड जिल्ह्यात पकडण्यात आल्याची माहिती एनसीबी मुंबईचे संचालक समीर वानखेडे यांनी माध्यमांना दिली आहे. एएनआयच्या ट्वीटमध्ये चुकून ज्या ठिकाणी ट्रक सापडला, त्याऐवजी ज्या ठिकाणी हा ट्रक जाणार होता म्हणजेच जळगाव जवळील एरंडोलचे नाव टाकले गेले. यामुळे गोंधळ उडाला होता. तर हा ट्रक एरंडोलनंतर महाराष्ट्रात इतर ठिकाणी गांजाचे वितरण करणार असल्याची माहिती काही माध्यमांनी नुकतीच दिली आहे.