आबुधाबी । वृत्तसंस्था
मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट राईडर्सचा 49 धावांनी पराभव केला .
यंदाच्या आयपीएलमधील पहिला विजय मिळवला आहे.मुंबईने ठेवलेल्या 196 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतांना केकेआरला 9 बाद 146 धावांपर्यंतच मजल मारता आली.
केकेआरकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक 33 तर कर्णधार दिनेश कार्तिकने 30 धावांची खेळी केली.मुंबईकडून बुमराह,बोल्ड आणि पॅटिन्सन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतली तर पोलाडॅ आणि चाहरने प्रत्येकी एक विकेट घेतली.राणा आणि कार्तिक बाद झाल्यावर आंद्रे रसेल आणि इऑन मॉर्गन हे दोन ट्वेन्टी-20 क्रिकेटमधील दोन फलंदाज खेळपट्टीवर होते.
या दोघांनीही स्थिरस्थावर व्हायला थोडा वेळ घेतला. पण मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने या दोघांनाही एकाच षटकात बाद केले आणि त्यानंतर केकेआरच्या विजयाच्या आशा मावळल्या.
त्याआधी रोहित शर्माच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं कोलकात्यासमोर 196 धावांचे आव्हान ठेवले होते. रोहितने कर्णधाराला साजेशी खेळी करताना 54 चेंडूत तीन चौकार आणि सहा षटकारांसह 80 धावा फटकावल्या. त्याने सूर्यकुमार यादवच्या साथीने दुसर्या विकेटसाठी 90 धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. सूर्यकुमार यादवने 47 धावांचे योगदान दिले. त्यामुळे मुंबईला 20 षटकात पाच बाद 196 धावांचा डोंगर उभारता आला. कोलकात्याकडून शिवम मावीनं 32 धावा देत दोन विकेट्स घेतल्या.
सूर्यकुमार बाद झाला असला तरी रोहित मात्र चांगलाच स्थिरस्थावर झाला होता. त्यामुळे रोहितने यावेळी संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आण अर्धशतकही झळकावले. रोहितने केकेआरच्या गोलंदाजांचा यावेळी चांगलाच समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले. कारण रोहितपुढे केकेआरच्या गोलंदाजांचे काहीही चालत नव्हते. रोहितने यावेळी 54 चेडूंत चीन चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर 80 धावांची खेळी साकारली.
रोहित यावेळी शतक झळकावेल, असे चाहत्यांना वाटत होते, पण त्याचे शतक या सामन्यात हुकले. रोहित शर्मा बाद झाल्यावर हार्दिक पंड्याही लगेच बाद झाला. त्यामुळे मुंबईला अखेरच्या षटकांमध्ये मोठी फटकेबाजी करता आली नाही. मुंबईला या सामन्यात 200 धावांचा पल्ला गाठायची संधी होती, पण त्यांना या संधीचे सोने करता आले नाही.